नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये अंबानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत दोन फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला 300 कोटींच्या लाचेची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपनेते सत्यपाल मलिक यांनी केला. मात्र आपण हा सौदा रद्द केल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या निर्णयाचं समर्थन केलं. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्दावर तडजोड करण्याची गरज नसल्याचं देखील मोदींनी म्हटलं होतं. मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहे. मात्र केंद्र सरकारच्या शेतकरी कृषीकायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला मलिक यांचा पाठिंबा आहे.
मलिक यांनी स्पष्ट केलं की, कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहिलं तर आपण पदाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांसोबत उभं राहू. राजस्थानमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मलिक म्हणाले की, काश्मीरमध्ये असताना माझ्याकडे दोन फाईल आल्या होत्या. यापैकी एक अंबानी तर दुसरी संघाशी निगडीत व्यक्तीची होती. यापैकी एक मेहबुबा मुफ्तीच्या नेतृत्वातील पीडीपी आणि भाजप सरकारमधील मंत्री होता. तसेच पंतप्रधान मोदींचा निकटवर्तीय होता.
दरम्यान दोन विभागांच्या सचिवांनी मला हे काम बेकादेशीर असल्याचं म्हटलं होतं. तसेच दोन फाईलच्या मंजुरीसाठी प्रत्येकी 150 – 150 कोटी रुपये मिळतील, असंही सचिवांना सूचित केलं होतं. मात्र मी त्यांनी सांगितलं की, मी कुर्ता-पायजामाच्या पाच जोड्या घेऊन आलो असून केवळ तेवढंच घेऊन परत जाणार, असंही मलिक यांनी नमूद केलं.