कोलकाता – पश्चिम बंगाल मधील भाजप शाखेत निर्माण झालेल्या अडचणी अजून संपण्याची चिन्हे दिसेनात. आज पश्चिम वर्धमान जिल्ह्यात कटवा येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या समोरच भाजपच्या दोन गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. तथापी मुजुमदार आणि घोष यांनी या बाबीला फार महत्व देण्याचे टाळले. तृणमुल कॉंग्रेसच्या एजंटानेच हा प्रकार घडवला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे दोन्ही नेते दैहात कटवा येथे पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले असताना भाजपच्या एका गटाने दिलीप घोष यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच हा घोषणबाजीचा घोळ सुरू असताना दुसऱ्या गटाने या पहिल्या गटाला तेथून रेटत मागे सारण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांच्यात धुमश्चक्री झाली. त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्चाही फेकल्या. नंतर या दोन्ही गटांमध्ये कशीबशी शांतता प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुजुमदार म्हणाले की, या बैठकीत गोंधळ माजवण्यासाठी तृणमुल कॉंग्रेसनेच येथे आपले एजंट पाठवले होते.
हा गोंधळ नेमका कोणी माजवला त्यांना आम्ही शोधून काढू असे त्यांनी नमूद केले. तृणमुल मधून भारतीय जनता पक्षात आलेले बहुतेक जण आता पुन्हा मुळ पक्षात परत जात असून जे अजून पक्षात आहेत त्यांनी एकमेकांवर चिखल फेक सुरू केल्याने भारतीय जनता पक्षाच्या बंगाल शाखेच्या पुढे अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.