मंचर – वाळुंजवाडी-ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथील एका मध्यमवयीन व्यक्तीचा मारहाणीत खून झाल्याची घटना मंचर-घोडेगाव रस्त्यालगत घडली आहे. याबाबत मृत व्यक्ती बाळू राधु पारधी (वय 50) यांचा मुलगा संदेश पारधी यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, वाळुंजवाडी -ठाकरवाडी (ता. आंबेगाव) येथील बाळू पारधी (वय 50) हे कामासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरापर्यंत झाला घरी न आल्याने त्यांच्या बहिणीकडे गेले असतील म्हणून कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला नाही. दुसऱ्या दिवशी संदेश पारधी यांना आणि त्यांचे चुलते संदीप जिजाभाऊ पारधी यांना पोलीस पाटील सागर वाळुंज यांनी फोन करुन मंचर गावाच्या हद्दीत मंचर ते घोडेगांव रस्त्यालगत एक ओळखीचा इसम पडलेला असून तो तुमच्या समाजाचा आहे का, असे विचारू खात्री करण्यासाठी मंचर येथे बोलावले.
संदेश पारधी आणि त्यांचे चुलते संदीप पारधी यांनी तेथे जाऊन पाहिले असता बाळु पारधी हे मृत स्थितीत दिसले. तसेच त्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे त्यांना उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे करीत आहेत.