शारजा – आयपीएल स्पर्धेच्या सोमवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा पंचांशी जोरदार वाद घालताना दिसला.
एलिमिनेटर सामन्यात कोलकाताने बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पराभव दिसू लागल्याने कोहली सातत्याने संतप्त होत असल्याचेही दिसून आले. याचवेळी कोहलीने राहुल त्रिपाठीला नाबाद ठरवल्याने पंचांशी वाद घातला. कोलकाताच्या डावातील सातव्या षटकात हा वाद घडला.
बेंगळुरूचा लेग स्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या चेंडूवर त्रिपाठी पायचित झाल्याची दाद पंचांकडे मागण्यात आली. पंचांनी त्याला नाबाद ठरवले व त्याचवेळी कोहलीने डीआरएस घेतला. त्यात राहुल त्रिपाठी बाद असल्याचा निर्णय देण्यात आला. पंचांनाही आपला आधीचा निर्णय बदलून त्रिपाठी बाद असल्याचे जाहीर करावे लागले.
त्रिपाठी बाद झाल्याचा निर्णय दिला गेल्यावर कोहलीने थेट मैदानावरील पंचांकडे धाव घेतली व त्यांच्याशी जोरदार वाद घातला. कोहलीच्या या वर्तनावर समालोचकांनीही नाराजी व्यक्त केली. कोहलीकडून अशा घटना सातत्याने घडत असून आता त्याच्याबाबत बीसीसीआय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.