शारजा – आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 4 विकेट्सने पराभव झाला आहे. याचसोबत त्यांचे प्ले-ऑफला पोहोचण्याचे स्वप्न आणखी धूसर झाले आहे. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अश्विनने षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केला.
निर्धारित लक्ष्य गाठताना दिल्लीची आघाडीची फळी कोलमडली. त्यांचे 3 गडी केवळ 30 धावांवर माघारी परतले. सलामीवीर शिखर धवन धावबाद झाला, त्यानंतर पृथ्वी शॉला कृणाल पंड्याने पायचीत पकडले. यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने डाव पुढे नेला आणि संघाचा स्कोर 57 धावांवर आणला. पंतने 22 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. अक्षर पटेल ट्रेंट बोल्टचा बळी ठरल्यावर दिल्लीचा निम्मा संघ 77 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर दिल्लीच्या विकेट्स देखील नियमित अंतराने पडत राहिल्या; परंतु श्रेयस अय्यर (नाबाद 33) एका टोकावर राहिला आणि संघाला विजय देऊनच परतला. रविचंद्रन अश्विनने (नाबाद 20) विजयी षटकार मारल्यावर दिल्लीने 19.1 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईची खराब सुरुवात झाली. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने सर्वाधिक 33 धावा केल्या. मात्र, इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीच्या घातक गोलंदाजीसमोर मुंबईचे फलंदाज टिकू न शकल्याने 20 षटकांत 8 बाद 129 धावा करू शकला.
सविस्तर निकाल
मुंबई इंडियन्स : 20 षटकात 8 बाद 129 (डी कॉक 19, सूर्यकुमार यादव 33, सौरभ तिवारी 15, हार्दिक पंड्या 17, कृणाल पंड्या नाबाद 13. अक्षर पटेल 3-21, आवेश खान 3-15) दिल्ली कॅपिटल्स : 19.1 षटकात 6 बाद 130 (ऋषभ पंत 26, श्रेयस अय्यर नाबाद 33, रविचंद्रन अश्विन नाबाद 20. कृणाल पंड्या 1-18, जयंत यादव 1-31)