लखीमपूर – केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील वर्षभरापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचं लोन उत्तर प्रदेशात पसरलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप नेत्यांना आंदोलनांना सामोरं जावं लागत आहे. मात्र लखीमपूर येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच गाडी घातली. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविली. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
लखीमपूर खीरीचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्र याने शेतकऱ्यांवर गाडी चढविली. उप मुख्यमंत्री केशव मोर्य हे अजय मिश्र यांच्या मुळ गावी सभा घेण्यासाठी आले होते.
यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. मात्र त्याआधीच आंदोलक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत काही शेतकरी जखमी झाले. तसेच मोनू मिश्र याने या शेतकऱ्यांवर गाडी चालविल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोनूच्या दोन ते तीन गाड्या पेटवून दिल्या आहेत.