नवी दिल्ली: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपा सहजच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपा फक्त जिंकणारच नाही, तर २०१७ मध्ये केलेला ३१२ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड मोडीत काढत ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असेदेखील आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत योगी यांनी हा दावा केला आहे. राज्य सरकारची आत्तापर्यंतची कामगिरी, आर्थिक विकास, राज्यातली कायदा व सुव्यवस्था पाहूनच पुन्हा एकदा विजय प्राप्त होईल. आदित्यनाथ यांना विश्वास आहे की ते त्यांच्या सरकारच्या कारभाराच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करून आणि जातीय समीकरणाचा समतोल साधून कोणत्याही सत्ताविरोधावर मात करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
“मला परत जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. मी उत्तर प्रदेशची राजकीय गतिशीलता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, कारण मी गेल्या २३ वर्षांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. मला उत्तर प्रदेशातील मतदारांची राजकीय समज आणि परिपक्वतेबद्दल विश्वास आहे,” असेही योगी म्हणाले.
२६ सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि आणखी सात मंत्र्यांसाठी जागा तयार केली. सामाजिक संतुलन राखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आपण आणखी जागा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
आदित्यनाथ यांनी हे देखील स्पष्ट केले की, भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही.