मुंबई – दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात पूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करु दिले पाहिजे. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे.
या प्रकरणाचा महाराष्ट्र पोलीस कसून तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, देशात विविध ठिकाणी घातपाताच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन काही संशयित व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यासर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या घटनेबाबत त्यांनी मला सर्व माहिती दिली आहे. अजून याप्रकरणाची सर्व माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. हे प्रकरण नाजूक आहे. हा राजकारणाचा विषय नाही. यामध्ये अपयश आहे, असे मी म्हणणार नाही. यातले फार बारकावे मला सांगता येणार नाहीत.
त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. या घटनेवर महाराष्ट्र एटीएसचे लक्ष आहे. पोलिसांना पोलिसांच्या पद्धतीने तपास करू दिला पाहीजे. त्यातून सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल.
आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो. जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केले जाते. पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे.
सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलने करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना अजिबात दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.