स्वप्निल श्रोत्री
थोड्या-थोड्या तुकड्यात एखाद्या राष्ट्राची जमीन बळकावत जाणे; परंतु इतकी नाही की ते राष्ट्र थेट युद्धाची भाषा बोलायला लागेल, यालाच “सलामी टॅक्टिस्’ असे म्हणतात.
सत्ताकारण हा जागतिक राजकारणाचा मूळ गाभा आहे. अगदी प्राचीन काळापासून विविध राजे, सम्राट यांचा इतिहास पाहिला तर आपणास हे प्रकर्षाने जाणविते. आपल्या साम्राज्याचा जास्तीत जास्त विस्तार करणे आणि इतर राष्ट्रांना आपल्या अधिन बनविणे हा त्यामागचा मूळ उद्देश होता. काळ बदलला तसे राजे आणि राज्यकर्ते बदलले. राज्यांची नावे आणि सीमा बदलल्या. परंतु, सत्ताकारण हे जागतिक राजकारणाचे तत्त्व आजही जसेच्या तसे पाहावयास मिळते.
अमेरिकेला जग आज महासत्ता म्हणून ओळखते. महासत्ता नावाचा मुकुट अमेरिकेच्या डोक्यावर आला तो सत्ताकारणामुळेच. अमेरिकेने कधीही दुसऱ्या राष्ट्रांचे प्रदेश बळकाविले नाहीत. परंतु, राजकारणावर आणि अर्थकारणावर अमेरिकेचा अंकुश दिसून येतो. सत्ताकारणाचे हे आधुनिक रूप आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
जागतिक राजकारणात जसा अमेरिकेचा बोलबाला आहे तसाच बोलबाला गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून चीनचासुद्धा आहे. अमेरिकेने जागतिक राजकारण नियंत्रित करण्यासाठी बळाचा आणि अर्थकारणाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. चीन अमेरिकेच्या पुढे जाऊन साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतीचा वापर करताना दिसून येतो.
ज्या राष्ट्रांना पैशाच्या बळावर गुलाम बनविता येणे शक्य आहे त्यांना पैशाच्या बळावर गुलाम बनविणे, ज्यांना धमकीच्या बळावर शांत करता येणे शक्य आहे त्यांना धमकी देऊन शांत करणे, जे देश कसल्याही पद्धतीने ऐकण्यास तयार नाहीत त्यांच्याशी लष्करी संघर्ष करणे किंवा त्या देशात अंतर्गत अशांतता निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे ही चीनची नीती आहे.
जेव्हा जागतिक राजकारणात चिनी आक्रमकतेबाबत चर्चा केली जाते तेव्हा “सलामी टॅक्टिस्’ हा शब्द हमखास चर्चिला जातो. किंबहुना चीनचे संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारण हे याच शब्दाभोवती फिरताना दिसते.
सलामी टॅक्टिस् म्हणजे नक्की काय?
एखाद्या राष्ट्राच्या भूभागावर किंवा अर्थव्यवस्थेवर किंवा स्वायत्ततेवर अशाप्रकारे आक्रमण/अतिक्रमण करायचे की, त्या राष्ट्राला आपल्यावर आक्रमण/अतिक्रमण झाले आहे हे समजलेच नाही पाहिजे. थोडक्यात, एखाद्या राष्ट्रावर इतके आक्रमण/अतिक्रमण असे करायचे नाही की तो थेट युद्धाची भाषा करायला लागेल. उदा., जर चीनला भारताचे एखादे राज्य बळकावयाचे असेल तर चीन भारतावर पूर्ण शक्तिनिशी हल्ला कधीही करणार नाही. (सन 1962 चे युद्ध हा अपवाद असून त्याला अनेक कारणे आहेत) सुरुवातीला तो 2 किमी आत येईल. मग भारताची प्रतिक्रिया काय आहे याचा अंदाज घेईल. जर आक्रमक प्रत्युत्तर मिळाले तर चीन मागे सरकेल, पण 1 किमी म्हणजेच 1 किमी जमीन चीनने बळकाविली आहेच.
जर एखाद्या राष्ट्राचा चीनच्या अतिक्रमणाला थंड प्रतिसाद असेल तर चीन 2 किमी वरून 4 किमी, 4 किमी वरून 8 किमी असं हळूहळू आत येत राहतो आणि जेव्हा त्या राष्ट्राला हे समजते तोपर्यंत हातातून बरेच काही गेले असते. ज्या राष्ट्रांच्या मुख्य भूमी या चीनपासून लांब आहेत त्या राष्ट्रांच्या जमिनी पैशाच्या बळावर चीनने बळकाविल्या आहेत. जेथे दोन्ही शक्य नाही त्या राष्ट्रांच्या बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तूंची डंपिंग करून त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था व बाजारपेठेवर चिनी अतिक्रमण झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते.
भारताविरोधात अनेकदा वापर
चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला सुरूंग लावण्याची क्षमता भारताकडे असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारताचा बंदोबस्त करणे चीनसाठी आवश्यक आहे. गेल्या 70 वर्षांतील भारत-चीन संबंधांचा अभ्यास केला तर चीनने भारताविरोधात सलामी टॅक्टिस्चा वापर अनेकदा केल्याचे दिसून येते.
सन 1962 मध्ये चीन युद्धाच्या तयारीने भारतात आला होता; परंतु हळूहळू 40 किमी आत भारतीय हद्दीत चिनी लष्कर घुसल्यावर भारताच्या हे लक्षात आले. इतर राष्ट्रांप्रमाणे पहिल्याच दिवशी युद्ध जाहीर करून जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न चीनने आपल्या इतिहासात कधीही केला नाही. भारताचा अतिक्रमण केलेला ईशान्येकडील प्रदेश चीनने युद्धानंतर परत केला खरा; परंतु त्याबदल्यात जम्मू-काश्मीरचा काही प्रदेश बळकाविला.
म्हणजेच दोनपैकी भारताचाच एक भाग परत केला तर एक बळकाविला. सन 1967 च्या युद्धात याच रणनीतीचा वापर करण्याचा प्रयत्न चीनने केला. सन 2018 मधील डोकलाम आणि गेल्या वर्षी जून महिन्यातील गलवान खोऱ्यातील प्रकरण हे सर्व सलामी टॅक्टिस्ची उदाहरणे आहेत.
हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव
हिंदी महासागर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हे भारताचे पारंपरिक प्रभावक्षेत्र राहिले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचा मोठ्या प्रमाणावर वावर येथे पाहावयास मिळतो. परंतु, मागील काही वर्षांपासून चिनी नौदलाचा वावर हिंदी महासागरात वाढल्याचे दिसून येते. सन 2000 पर्यंत चिनी नौदल हे आजच्या इतके सक्षम नव्हते. नौदलाच्या सक्षमीकरणासाठी नौदलाचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच चीनने हिंदी महासागरात सुरुवातीला छोटी-मोठी व्यापारी व प्रवासी जहाजे सोडण्यास सुरुवात केली.
भारताशिवाय आजूबाजूच्या राष्ट्रांचा थंड प्रतिसाद पाहून व्यापारी जहाजांची जागा लष्करी जहाजांनी घेतली. इतर राष्ट्रांकडून फार मोठा विरोध न झाल्याने चिनी नौदलाच्या जहाजांचे ताफे हिंदी महासागरात फिरू लागले. आज परिस्थिती अशी आहे की, चीनच्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या या हिंदी महासागरात वेळोवेळी गस्त घालताना दिसतात. भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा फार मोठा धोका असून आणीबाणीच्या परिस्थितीत भारताच्या कोणत्याही शहराला थेट लक्ष्य करण्याची क्षमता ही चिनी नौदलाकडे आलेली आहे.
चीनकडे प्रचंड प्रमाणात पैसा आणि मोठी लष्करी ताकद आहे. संपत्ती आणि शक्ती या दोन्ही गोष्टी एकाचवेळी चीनच्या हाती लागल्यामुळे डोके बधिर होणे स्वाभाविक आहे. आपल्या मनानेच आंतरराष्ट्रीय सीमा ठरविणे, आपणच पूर्वी केलेले आंतरराष्ट्रीय करार न मानणे, आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाची अवहेलना करणे यांसारखी कृती गेली अनेक वर्षे चीनकडून सुरू आहे.
चीन हे नाव फक्त भारतासाठीच संकट बनून आलेले आहे असे नाही तर भारताशिवाय जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांसाठी भविष्यात संकट बनणार आहे. त्यामुळे चीनचा बंदोबस्त करणे ही काळाची गरज असून त्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत.