मुंबई – कंगनाचा ‘थलायवी” कालच रिलीज झाला. अद्रमुकच्या नेत्या आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला आहे. कंगनाला या सिनेमापासून खूप अपेक्षा आहे.
मात्र, सिनेमा रिलीज झाल्यावर कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “थलायवी’ बघितल्यानंतर अद्रमुकचे काही नेते नाराज झाले आहेत. एका सीनमध्ये जयललिता एम. जी. रामचंद्रन यांना न कळवता इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची भेट घेताना दर्शवले आहे.
काही सीनमध्ये एमजीआर हे जयललिता यांना कमी महत्त्व देत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. असे काही सीन या सिनेमातून वगळले गेले तरच हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल, असे अद्रमुकचे माजी मंत्री डी. जयकुमार यांनी म्हटले आहे.
मात्र, जयकुमार यांच्या या आक्षेपांवर अद्याप “थलायवी’च्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. स्वतः कंगनानेही अद्याप या आक्षेपांवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नाही तर
आतापर्यंत वाद सुरू झाले असते. बाकी सर्वसामान्य प्रेक्षकांना जयललिता यांच्या जीवनावरील हा सिनेमा खूपच आवडला आहे. खूप आवडला असेल, असे गृहित धरायला काही हरकत नसावी.