कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण गणेशवंदन करतो. त्याप्रमाणे रामदास स्वामींनीही त्यांचा “दासबोध’ हा प्रसिद्ध असलेला ग्रंथ लिहिण्यास सुरुवात करताना प्रथम “गणेशस्तवन’ केले आहे. रामदासांची भाषा लयबद्ध, अर्थपूर्ण, रोखठोक. त्यांच्या भाषेत गणपतीचे स्तवन वाचताना वेगळाच आनंद मिळतो.
संतांच्या दृष्टीने गणपती म्हणजे कोण? तर गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. या जाणिवेलाच ईश्वर असे म्हणतात. इतर कोणत्याही प्राणिमात्रापेक्षा माणसाची बुद्धी तल्लख आहे. कोणत्याही गोष्टीचे आकलन होणे, अर्थ समजण्याची पात्रता असणे हे माणसालाच अधिक चांगल्या रीतीने शक्य होते. गणपतीचे अधिष्ठान माणसाला ज्ञानाकडे खेचून नेते, असे रामदास स्वामी म्हणतात.
गणपती ज्ञानस्वरूप आहे व म्हणून कोणत्याही गोष्टीचा अर्थ कळण्यासाठी किंवा अज्ञान दूर होण्यास गणपतीची कृपा आवश्यक असते. बहुतेक सर्व संत हाच भाव मनात बाळगून गणेशाला वंदन करतात. ज्ञानसाधना चालू असताना मध्येच विघ्ने उद्भवू नयेत; उद्भवल्यास गणेशाच्या कृपेने त्यांचा नाश व्हावा म्हणून तो विघ्नहर्ता आहे.
रामदासांनी दासबोधात लिहिलेल्या गणेशस्तवनात ते गणपतीला विनंती करतात,
“माझिये अंतरी भरावे। सर्वकाळ वास्तव्य करावे।
मज वाग्सुंन्यास वदवावे। कृपाकटाक्षेकरूनी।।’
रामदासांची अशी इच्छा आहे की, गणपतीने माझे
अंतःकरण आतबाहेर व्यापून टाकावे. तेथेच त्याने कायमचे घर करून राहावे, सतत माझ्याबरोबर असावे. आपण जणू मुके आहोत, शब्दांचे काहीच ज्ञान आपल्याला नाही अशी विनम्रता धारण करून ते म्हणतात, गणपतीने माझ्यावर कृपा करावी आणि माझ्यासारख्या मुक्या माणसाला ग्रंथ सांगण्याचे सामर्थ्य द्यावे. त्यानंतर ते गणपतीस उद्देशून म्हणतात,
“तुझिये कृपेचेनि बळे। वितुळती भ्रांतीची पडळे।’
तुझ्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम, अज्ञान यांची पडळे म्हणजे आवरणे गळून पडतात, वितळून जातात.
“जयाचे आठविता ध्यान। वाटे परम समाधान।’ त्याच्या रूपाचे चिंतन केले, ते डोळ्यासमोर आणले की, मनाला मोठे समाधान मिळते.
त्यानंतर ते गणपतीच्या सगुण रूपाचे वर्णन करतात. ते म्हणतात,
“सगुण रूपाची ठेव। माहा लावण्य लाघव।
नृत्य करितां सकळ देव। तटस्त होती।।’
गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे. त्याचे लाघवी रूप मनाला मोहवते. त्याचे लावण्य काय वर्णावे… गणपती नृत्य करू लागला की सगळे देव स्वतःला विसरून नुसते त्याच्याकडे पाहातच राहतात.
रामदासांची शब्दकळा फार मनोहारी आहे. त्यांच्या ओव्या आपण मोठ्यांदा म्हटल्या तर त्यांनी शब्द कसे ठाशीव, यमक जुळवून लिहिले आहेत ते जाणवते. जसे रामरक्षा मोठ्यांदा म्हटली तर उच्चार स्पष्ट होतात, तसेच रामदासांच्या ओव्याही मोठ्यांदा म्हटल्या तर जीभ वळवून प्रत्येक अक्षर स्पष्टपणे म्हटले जाते. मराठी भाषेतील ळ, ज्ञ यांसारखी काही अक्षरे आपण मराठी माणसं उत्तम प्रकारे उच्चारू शकतो, याचे श्रेय अशा संतांना जाते. गणपती कसा दिसतो हे ते कसे सांगतात पहा ः
“दंत शुभ्र सद्दट। रत्नखचित हेमकट्ट।
तया तळवटीं पत्रे नीट। तळपती लघु लघु।।’
गणपतीचे दात घट्ट व पांढरे शुभ्र आहेत. त्याच्या हातात रत्नखचित सोन्याचे कडे आहे. कड्याच्या खाली लहान लहान सोन्याची पाने चमकताना दिसतात. कशी चमकतात तर… लघु लघु. थोडी थोडी. मधूनमधून. किंचितशी. किती सुंदर शब्दयोजना केली आहे पहा.
गणपतीचे हे रूप तर पहा ः
“रत्नखचित मुगुटीं झळाळ। नाना सुरंग फांकती कीळ।
कुंडले तळपती नीळ। फडै फडै कर्णथापा।।’
गणपतीच्या मुकुटात सुंदर रंगांची रत्ने आहेत. ती तेजाने झळकतात. त्यांचे सुरेख रंग आजूबाजूला प्रकाश फेकतात. गणपतीच्या कानातील कुंडले तर चमकतातच पण त्यात बसवलेले नीलमणीदेखील पहा कसे प्रकाशाचे झोत टाकत आहेत. तळपत आहेत. नटलेल्या गणपतीचे हे वर्णन वाचून आपल्या डोळ्यासमोर गणपतीचे देखणे चित्र उभे राहते. पुढे ते म्हणतात ः
“स्थिरता नाही येक क्षण। चपळविशईं अग्रगण।
साजिरी मूर्ति सुलक्षण। लावण्यखाणी।।’
गणपती शरीराने स्थूल असला तरी तो क्षणभरदेखील स्थिर राहात नाही. चपळपणात तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याची मूर्ती कशी सुलक्षणी आहे! साजिरी आहे. लावण्याची खाणच जणू काही! किती मोजक्या शब्दात, एकेका शब्दात वर्णन केले आहे! आजकाल आपण खूप बोलतो. त्यातला मुद्दा अगदीच छोटा असतो. रामदासांची शब्दरचना उलट आहे. एका शब्दाची अनेक वाक्ये होतील इतका अर्थ असतो त्यांच्या ओवीत.
“रुणझुणा वाजती नेपुरे। वाकी बोभाटती गजरे।
घागरियासहित मनोहरें। पाउले दोनी।।’
या ओवीमध्ये गणपतीच्या अंगावरच्या नाजूक दागिन्यांमधून किती गोड ध्वनी ऐकू येतो, ते रामदास सांगतात. पायातले पैंजण कसे वाजतात?… तर रुणझुण असा गोड आवाज ते करतात. दंडातल्या वाक्या मात्र “बोभाटती’. बोभाटा होईल असा त्या गजर करतात. पावलांमधे मनोहर घुंगरू. दोन्ही पायांमधली ही घुंगरे मन आकर्षित करतात. आणि मग शेवटी अशा ह्या बुद्धिदाता गणपतीचे आपल्या साहित्यलेखनासाठी कसे साह्य होते हे ते सांगतात. म्हणतात,
“साहित्यविशईं सुल्लभा। अष्ट नायिका होती।।’ गणपतीचे सान्निध्य लाभले की, साहित्यनिर्मिती करणे सुलभ होते, सोपे होते. विद्येच्या अष्टनायिका सदैव साह्य करण्यास तयार होतात.
अखेरीस “ऐसा सर्वांगे सुंदरू। सकळ विद्यांचा आगरू।
त्यासी माझा नमस्कारू। साष्टांग भावे।।’
समर्थ रामदास गणपतीची परोपरीने स्तुती करतात आणि म्हणतात, अशा या सर्वांगसुंदर, सर्व विद्यांचे आगर असलेल्या गणपतीस माझा भावपूर्ण साष्टांग नमस्कार.
माधुरी तळवलकर