एका शहरी कॉलनीत एकंद घर होतं. जे अनेक दिवसांपासून बंद होतं. त्यामुळे कॉलनीतील आजूबाजूचे लोक त्या घराच्या व्हरांड्यातच कचरा टाकायचे. अशातच एक दिवस त्या बंद घरात एक मध्यमवर्गीय जोडपं राहायला येतं. घरी येताच त्यांना समोर मोठा कचऱ्याचा ढीग दिसतो. परंतु राहायला यायचे असल्याने दोघेही घराची आणि व्हरांड्याची छान साफसफाई करतात. त्यानंतर ते रात्री दमून झोपी जातात.
सकाळी उठून पाहतात तर काय पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकलेला असतो. दोघेही प्रश्नार्थक भावाने एकमेकांकडे पाहतात आणि पुन्हा खराटा घेऊन तो कचरा साफ करतात. असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन् हे सुशिक्षित दाम्पत्य मात्र खराटा घेऊन स्वच्छता करत असतात.
एके दिवशी ते दोघे व्हरांड्यात आणि गच्चीवर छान गुला, झेंडू, मोगरा अशी फुलझाडे आणून लावतात. या निमित्ताने का होईना शेजारचे लोक कचरा टाकायचे बंद होईल अशी त्यांना आशा असते. परंतु दुसऱ्या दिवशी पाहतात तर काय पुन्हा तेच. दोघेही कोणाशीही वाद न घालता नित्यनेमाने स्वच्छता करीत राहतात.
आता गणेशोत्सव जवळ आलेला असतो. व्हरांड्यातील फुलझाडांना कचऱ्याच्या अंशाने खत मिळाल्यामुळे ती छान बहरलेली असतात. परंतु गच्चीवरील फुलझाडांना मात्र जेमतेम फुले आलेली असतात. मात्र एवढे असूनही लोक त्यांचे कचरा टाकण्याचे काम थांबवत नव्हते. गणेश प्रतिष्ठापना करण्याचा दिवस उजाडतो. सर्वजण बाप्पाच्या आगमनाने सुखावलेले असतात. एकूणच सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते. हे दोघे नवरा-बायको पहाटे उठतात. छोट्या टोपल्यांमध्ये रंगीबेरंगी फुले तोडून भरतात. ती टोपली घेऊन शेजारच्यांच्या घरी जातात.
ज्यांच्या दारात आपण कचरा टाकतो तेच आज आपल्या दारात फुले घेऊन उभे असलेले पाहून शेजारी गडबडतात. आता सणासुदीला हे भांडायला आले की काय? असं म्हणून ते विवादाच्या आवेशातच दार उघडतात. समोर हे जोडपे मात्र हसतमुखाने हातातली फुलांची टोपली त्या शेजाऱ्यांना देतात. आणि म्हणतात हे घ्या गणेश पूजेसाठी फुले आहेत वाहायला.
शेजारी चकित होतात. शेवटी ओशाळून त्यातला एकजण म्हणतो की, आम्ही तुमच्या व्हरांड्यात रोज कचरा टाकतो, तरी तुम्ही भांडण न करता उलट आम्हालाच फुले द्यायला आलात. हे कसं काय? त्यावर ते म्हणतात, ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो. तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फुले होती ती मी दिली.
उलट यात तुमचेच आभार मानले पाहिजे की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या फुलझाडानां इतकी छान फुले बहरली. उलट गच्चीवरच्या झाडाला म्हणावी तेवढी फुले नाही आलीत. आता बहुतेक गच्चीवरही तुमचा कचरा लागेल वाटतं, असं म्हणत खळखळून हसतात. शेजारच्यांना
स्वतःच्या कर्माची लाज वाटू लागते. त्या दिवसापासून ते कचरा व्हरांड्यात टाकणे बंद करतात. गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच एव्हाना स्वच्छतेचा श्रीगणेशा झालेला असतो.
या प्रसंगातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते. ती म्हणजे आयुष्यात आपण जे कर्म करतो त्यावर आपला ठाम विश्वास हवा. कारण आपले कर्म, आपली सद्भावना ही नक्कीच आपले जीवन सुखकर करण्यात मोलाची ठरत असते. समोरचा आपल्याला काय देतो यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण त्याला काय प्रतिसाद देतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
रस्त्याने दुचाकी चालविताना एखाद्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करताना गाडीला हलकासा धक्का दिला आणि उलट आपल्याकडेच रागाने पाहू लागला तर… आपण “आरे ला कारे’ केले तर नक्कीच वाद वाढणार. अशावेळी त्याऐवजी एक हास्य देत, “इट्स ओके… तुम्ही व्हा पुढे’, असे म्हटल्यास समोरचा व्यक्तीही कदाचित सद्वर्तन करेल. त्यामुळे आपण आपल्या कर्माबाबत नक्कीच आग्रही असायला हवे. मात्र, यासाठी परिस्थिती अगदीच हाताबाहेर असेल तेव्हा मात्र स्वाभिमान जागृत व्हायलाच हवा.
आपण नेहमी ऐकतो “कर्म रिटर्न्स’ होय हेच ते कर्म जे योग्य वेळी आपल्याला योग्य गोष्ट देते. तुम्ही चांगले कर्म केले तर निश्चितच तुम्हाला चांगले फळ मिळेल. मात्र, त्याचवेळी समोरच्याने वाईट किंवा भावना दुखावेल, असे कृत्य जरी केले तरी त्यातून त्याला माफ करावे, या माफीतून काहीतरी सकारात्मक घडेल याबाबत आशावादी राहावे. यावर हिंदीत एक म्हण आहे “कर भला तो हो भला.’ त्यामुळे कर्माबाबत आपण नेहमीच सकारात्मक राहायला हवे. लक्षात ठेवा कर्म हे एक शेत आहे. मागून काही मिळत नाही. तिथून तेच मिळते जे तुम्ही पेरलेले असते. अगदी ज्वारीच्या दाण्याप्रमाणे. तुम्ही आनंदाचा एक बीज पेराल तर तुम्हाला आनंदानी गच्च भरलेले कणीस नक्कीच मिळणार.
सागर ननावरे