लंडन – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री करोनाबाधित झाल्यामुळे त्यांच्यासह सपोर्ट स्टाफला दहा दिवस विलगीकरणातच राहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील मॅंचेस्टर येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मंगळवारी भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे या सामन्यावरचे सावट दूर झाले आहे.
शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये झाले होते. त्या कार्यक्रमाला जे निमंत्रित उपस्थित होते त्यांच्याशी हितगुज करतानाच करोनाच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे स्पष्ट होत असून तिथेच शास्त्री यांना करोनाची बाधा झाल्याचे वर्तवले जात आहे.
या कार्यक्रमानंतर शास्त्री यांना त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघ शास्त्री यांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले गेले.
शास्त्री यांची अँटीजेन चाचणी रविवारी करण्यात आली होती व त्यात ते करोनाबाधित असल्याचे समोर आल्यावर त्यांची आरटी पीसीआर चाचणीही केली गेली होती. त्याचाही अहवाल आला व त्यातही शास्त्री करोनाबाधित असल्यावर शिक्कामोर्तब झाले होते. सपोर्ट स्टाफमधील गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधऱ व फिजीओ नितीन पटेल यांनाही शास्त्री यांच्यासह दहा दिवसांच्या विलगीकरणात पाठवले गेले होते. सोमवारी रात्री या सगळ्यांची पुन्हा एकदा चाचणी केली गेली व त्यात पटेल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले असले तरीही त्यांना विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे.
त्यामुळे पाचवी कसोटी खेळवली जाणार का असा प्रश्न विचारला जात होता. ही कसोटी एकाही प्रशिक्षकाशिवाय खेळण्याव्यतिरिक्त खेळाडूंसमोर अन्य कोणताही पर्याय राहिला नाही. खेळाडू मात्र, त्यासाठीही तयार असून त्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी कोहली आणि कंपनी सज्ज आहे.
चाचणीत खेळाडू निगेटिव्ह
शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात संघातील सगळेच खेळाडू आले असल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळेच या खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आला असून सर्व खेळाडू निगेटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीवरचे करोनाचे सावट दूर झाले आहे.