आळंदी – करोना आणि करोनामुळे निर्माण झालेले सर्व संकटे दूर होऊ दे आणि पुन्हा नव्याने जनजीवन पूर्ववत होऊन देवी सरस्वतीचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळा, विद्यालय विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजू दे, असे साकडे माऊलींना श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराच्या वतीने घालण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यालयात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 9 व्या व 12 व्या अध्यायाचे पारायण करण्यात आले. तसेच पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या वाणीतून संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर सुश्राव्य किर्तन सेवा पार पडली, त्यावेळी वरील साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष तथा संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश काळे, पुरुषोत्तम महाराज पाटील आणि त्यांची टीम, चरित्र समितीचे सर्व संचालक, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, शिक्षक-शिक्षिका तसेच संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यार्थी, पालक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या ऑनलाइन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यालयातील तंत्रस्नेही अध्यापक राहुल चव्हाण आणि त्यांना राजेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले.