मुंबई – विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल आपल्याला काहीही म्हणायचं नाही. राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले, ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव राज्यपालांकडे आम्ही दिला असल्यांच पवारांनी म्हटलं.
दरम्यान राज्यपालांकडून आमदार नियुक्त्यांसंदर्भातील अंतिम निर्णय आलेला नाही. मला आश्चर्य वाटते की अशाप्रकारची वक्तव्य कशी केली जातात ? किंवा आणखी काय, पण आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केल्याचं पवार म्हणाले. तसेच राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल, तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. पण मी त्यांना दिलेला शब्द पाळला असून राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहत आहोत, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांनी विधानपरिषदेसाठी शब्द दिला होता, असे सांगताना, राजू शेट्टी यांनी आमदारकीवरून नाराजी व्यक्त केली होती.