लीड्स – जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवण्यासाठी सातत्याने वक्तव्य करत असलेल्या भारतीय संघाचा डाव इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत केवळ 78 धावांवर संपला. बाद होण्याचे दुखः नाही परंतू ज्या पद्धतीने अत्यंत बेजबाबदारपणे भारताच्या प्रमुख फलंदाजांनी आपल्या विकेट गमावल्या ते पाहून विक्रमादीत्य सुनील गावसकर अत्यंत संतप्त झाले.
आता तर त्यांनी कर्णधार विराट कोहलीला एक सल्ला देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फोन कर आणि संघातील फलंदाजांचे कुठे आणि काय चुकत आहे त्यासाठी मार्गदर्शन घे असे सांगितले आहे.
जगातील एक सर्वोत्तम फलंदाज मांनला जात असलेल्या विराट कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अत्यंत सुमार कामगिरी आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर कोहली याही कसोटीच्या पहिल्या डावात 7 धावांवर बाद झाला. इंग्लंडमध्ये कोणत्याही फलंदाजाला धावा काढण्यात अडचणी येतात. मात्र, कोहली ज्या पद्धतीने बाद होत आहे, ते गंभीर आहे. त्याचे फुटवर्क सुमार आहे, चेंडूवर पाट येत नाहीत तसेच तो सातत्याने बाहेर जात असलेल्या चेंडूवर बाद होत आहे. याबाबत आता सचिनची मदत घेण्याची वेळ आली आहे, असे गावसकर यांनी सांगितले. कोहलीने आता तातडीने सचिनला फोन करून त्याची मदत घ्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
कोहलीने सचिनला फोन करून आपल्या फलंदाजीत काय चुकत आहे तसेच संघातील अन्य फलंदाजही इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर का अपयशी ठरत आहेत याबाबत मार्गदर्शन घ्यावे. खूप वर्षांपूर्वी सातत्याने अपयश येत असताना सचिनने सिडनी कसोटीत जे केले तेच आता कोहलीने केले पाहीजे.
या मालिकेत कोहली दुसऱ्यांदा जेम्स अँडरसनचा बळी ठरला. अँडरसनच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातात गेला. हे सातत्याने होऊ नये यासाठी सचिनपेक्षा अन्य कोणत्याही व्यक्तीचा सल्ला योग्य असेल असे मला वाटत नाही, असेही गावसकर म्हणाले.
सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनामुळे कोहलीच्या फलंदाजीत तसेच त्याच्या मानसिकेततही फरक पडेल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला. काही वर्षांपूर्वी सचिनने गावसकर यांचा असाच सल्ला घेतला होता व यशस्वी ठरला होता.