मुंबई – सध्या घाऊक आणि किरकोळ महागाईचा दर वाढला आहे. कारण खाद्यतेल आणि डाळी महाग आहेत. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी सरकार खाद्यतेल आणि डाळीचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याकरिता सरकार खाद्यतेल आणि डाळीवरील आयात शुल्क कमी करत आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन वस्तूंचा पुरवठा वाढेल. त्याचबरोबर किमती नियंत्रणात राहतील असे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले.
खरिपाचे पीक हाती आल्यानंतर एकूणच महागाई कमी होईल आणि महागाईचा दर पुन्हा चार ते सहा टक्क्यादरम्यान राहील असे त्यांनी सांगितले. रिझर्व बॅंकेने पतधोरणा वेळी महागाई लवकरच कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आह.े रिझर्व बॅंकेच्या मताशी आम्ही सहमत आहोत असे ते म्हणाले.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, करोना व्हायरसच्या काळामध्ये पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे महागाई वाढली होती. आता वाहतूक सुरळीत झाल्यामुळे पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई निश्चितपणे कमी होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात क्रुडचे दर कमी असूनही भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त आहेत. कारण या अगोदरच्या सरकारने जारी केलेल्या ऑइल बॉण्डवर सध्याच्या सरकारला व्याज द्यावे लागत आहे असे सीतारामन यांनी पुन्हा सांगितले. मात्र तरीही राज्य सरकारबरोबर चर्चा करून पेट्रोल आणि डिझेलवरील कार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.