नवी दिल्ली – अनेक वर्षापासून वाहन विक्री कमी होत आहे. मात्र सरकारकडून याबाबत स्पष्ट अशी कृती केली जात नाही. सरकारकडून फक्त तोंडी आश्वासने मिळतात असे वाहन उद्योगातील जेष्ठ उद्योजकांनी म्हटले आहे.
सिआम या वाहन उद्योजकाच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत बोलताना मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव म्हणाले की, वाहन उद्योगाने भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान केले आहे. मात्र याची दखल सरकारकडून घेतली जात नाही. कार फक्त श्रीमंतासाठीच असतात, त्याचा सर्वसामान्य लोकांशी काही संबंध नाही असे सरकारला वाटते.
याच कार्यक्रमात बोलताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी भारताचा विकास दर वाहन उद्योगाचा विकास झाल्याशिवाय वाढणार नसल्याचे स्पष्ट केले.भार्गव म्हणाले की, अशी चांगली वक्तव्य सरकारी अधिकाऱ्याकडून वेळोवेळी केली जातात. मात्र प्रत्यक्षात वाहन उद्योग वाढण्यासाठी काहीच केले जात नाही.
ते म्हणाले की वाहन उद्योगावर मोठा कर लावला जातो. उत्सर्जन कमी करण्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागते. वाहनांची सुरक्षा वाढविण्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे वाहनांची किंमत वाढते आणि सर्वसामान्य लोकांना वाहन घेणे परवडत नाही.
कुठल्याही प्रकारचे इंधन वापरले तरी या क्षेत्रात मोठा बदल होणार नाही. मुळात वाहन घेणे ग्राहकाला परवडले पाहिजे आणि त्यासाठी सरकारकडून कृतीची अपेक्षा आहे असे भार्गव म्हणाले. सरकारने दिलेल्या पाठिंब्यामुळे वाहन उद्योग वाढलेला नाही तर भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत, नकारात्मक वातावरण असूनही भारतातील ग्राहक वाहने खरेदी करीत आहे, त्यामुळे वाहन उद्योग वाढत आहे.
जेव्हा मारुती कंपनीची स्थापना झाली त्यावेळेस भारतातील वाहन उद्योग इतका वाढेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र भारतातील वाहन उद्योग आत जगातील चौथ्या क्रमांकाचा उद्योग आहे. आता सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी उद्योगांना मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. मात्र ही वाहने सर्वसामान्यांना परवडतात काय यासाठी सरकार काय करणार आहे असा प्रश्न भार्गव यांनी उपस्थित केला.
याच कार्यक्रमात बोलताना टीव्हीएस मोटार कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले की, भारतातील ग्राहक दुचाकीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या दुचाकीवर सध्या 28 टक्के जीएसटी आहे. हे तर्कसंगत वाटत नाही.
वाहन उद्योगाकडून तीन कोटी लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार दिला जातो. वाहन उद्योगाने इतकी प्रगती केली आहे की अगोदर वाहनांची आयात करावी लागत होती. आता भारतातून वाहनांची निर्यात केली जाते. मात्र सरकारकडून यासाठी काहीही मदत केली जात नाही.