नवी दिल्ली – काही कृषी उत्पादनाच्या किमती वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने योग्य वेळी त्यात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात तांदूळ, गहू यासारख्या आवश्यक उत्पादनाच्या किमती तुलनेने कमी झाल्या आहेत असा दावा केंद्र सरकारने केला आहे.
16 ऑगस्ट रोजी संपलेल्या महिन्यात या किमती कमी झाल्या आहेत असे अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे किरकोळ किमती बरोबरच घाऊक किंमतीतही घट झाली असल्याचे अन्न मंत्रालयाचे म्हणणे आहे.
1 महिन्यापूर्वी देशात सर्वसाधारणपणे तांदळाचे किरकोळ दर 35 रुपये 92 पैसे प्रति किलो होते. आता ते 1.78 टक्क्यांनी कमी होऊन 35 रुपये 28 पैसे प्रति किलो झाले आहेत असे अन्न मंत्रालयाचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर तांदळाचा घाऊक दर 2.17 टक्क्यांनी कमी होऊन 3030 रुपये प्रति क्विंटल या पातळीवर गेला आहे. गव्हाचा किरकोळ दर 2.18 टक्क्यांनी कमी होऊन 26 रुपये 52 पैसे प्रति किलो झाला आहे. तर गव्हाचा घाऊक दर 2. 82 टक्क्यांनी कमी होऊन 2258 रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
अन्नधान्याची महागाई वाढल्यानंतर त्याचा एकूण महागाईवर परिणाम होतो. ही महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकार आवश्यक त्या ठिकाणी हस्तक्षेप करीत आहे. किमती कमी व्हावा यासाठी खुल्या बाजारात 9.84 लाख टन गहू तर 4.13 लाख टन तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.