कोलंबो – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यामुळे श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाला धक्का बसला आहे. त्याच्यासह दोन्ही संघांना विलगीकरणात पाठवले गेले असले तरी मंगळवारी या दोन संघात होणारा दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे.
पहिला सामना जिंकत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती व मंगळवारचा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी भारतीय संघाला होती. भारतीय संघाने यापूर्वी झालेल्या एकदिवसीय मालिकेतही विजय मिळवला होता.
संघाच्या बायो बबलमध्येही करोनाची एन्ट्री झाल्यामुळे दोन्ही संघांना विलगीकरणात पाठवले गेले आहे. अर्थात दोन्ही संघातील अन्य खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता हा सामना बुधवारी 28 जुलैला खेळला जाणार आहे. कृणालला करोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात येणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंग्लंड दौऱ्यावरील प्रमुख संघातील शुभमन गिल, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी आणि सूर्यकुमारला इंग्लंडला पाठवले जाणार होते. आता त्यांनाही विलगीकरणात पाठवले गेल्यामुळे त्यांच्या इंग्लंडला जाण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मालिका रद्द होणार
कृणाल पंड्या करोनाबाधित आढळल्याने त्याला विलगीकरणात पाठवले गेले आहे. मात्र, असे असले तरीही त्याच्या संपर्कात संघातील आणखीही काही खेळाडू आल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत हा सामना बुधवारी कसा खेळवला जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही मालिका आता कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते.
एकदिवसीय मालिकेतच झाली होती एन्ट्री
भारताने एकदिवसीय मालिका जिंकली होती याच मालिकेपूर्वी श्रीलंका संघात करोनाची एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे. श्रीलंकेच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि व्हिडिओ ऍनालिस्ट हे करोनाबाधित असल्याचे आढळले होते. त्यामुळे ही मालिकाही पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून श्रीलंकेच्या कोणा खेळाडूला बाधा झाली होती का व तो प्रत्यक्ष सामन्यात खेळल्यामुळे करोनाचा प्रसार झाला का, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.