मुंबई – राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ‘प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.’ अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटुंबास दिले जाईल. तसेच पूर्णपणे घर पडलेल्यांना देखील मदत दिली जाणार आहे. असे देखील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल
‘सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल.’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केले होते. चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली होती.