मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच इकडे मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra | Seven people injured, three died after a building collapsed in Govandi area of Mumbai. Details awaited: Mumbai Police
— ANI (@ANI) July 23, 2021
गोवंडीतील या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे ४.५८ वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी ७ जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईत गुरुवारी थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी जमा झाले होते. दरम्यान, रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता, तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, महाराष्ट्रात चार ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.