नवी नियमावली जारी ः डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला
मुंबई – राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता केल्यानंतर काही दिवसांतच करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे. यासोबतच डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोकादेखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत.
आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असणार आहेत. महाराष्ट्र सरकारने 5 टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे.
काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्यांचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
पहिले दोन वर्ग रद्द
डेल्टा व्हेरियंटची दहशत आणि संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर सरकारने नवे निर्बंध जाहीर केले आहेत. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पाचपैकी पहिले दोन वर्ग रद्द करण्यात आले आहे. यापुढे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्यांना सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियम लागू होणार आहेत.
4 वाजता शटर डाऊन
करोना रुग्णांची संख्या सर्वात कमी असलेली तरीदेखील जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंतच रेस्टॉरंट्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे ज्यांचे सहभोजनाला जाण्याचे बेत आहेत, त्यांना दुपारी 4 वाजण्याच्या आत खाऊनपिऊन घरी परतावे लागणार आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये दिसणारं चित्र आणि डेल्टा व्हायरसच्या प्रसाराचा वेग या बाबींचा विचार करून सरकार पुढील निर्णय घेणार आहे.
पहिला बळी रत्नागिरीत
राज्यात करोनाच्या डेल्टा प्लस विषाणू संसर्गामुळे पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला. संगमेश्वरमधील 80 वर्षांच्या महिलेचा यात मृत्यू झाला असून, त्यांच्यावर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला अन्य व्याधींनीही ग्रासले होते, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.