– राहुल गोखले
सत्ता हेच संघटनेचे उद्दिष्ट बनले की, सत्तेचा विपरीत परिणाम संघटनेवर होत असतो. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवीच असते; त्याखेरीज राजकारणात येण्याचे त्यांना काही कारण नाही.
संघटनेची तटबंदी ही सत्ता आल्यानंतर कायम राहते का, हा खरा प्रश्न असतो. भारतीय जनता पक्षाला हा अनुभव सध्या अनेक राज्यांत येत असेल. आता भाजप ज्या स्थनावर आहे त्या स्थानावर अनेक वर्षे कॉंग्रेस होती.
विरोधी पक्ष दुर्बल होते आणि जरी त्यांना कधी सत्ता मिळाली तरी ती अंतर्विरोधांमुळे लवकरच संपुष्टात येईल. तेव्हा अशा प्रयोगांमध्ये कॉंग्रेसला पर्याय निर्माण करण्याची असोशी असली तरी कटिबद्धता नव्हती. त्यात केवळ सोयीस्करपणा आणि तात्कालिकता होती.
साहजिकच विरोधकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होई आणि कॉंग्रेसचे फावत असे. सत्तेचे आपणच नैसर्गिक दावेदार आहोत, असा प्रचार करण्याची संधी त्या पक्षाला मिळे आणि नंतर सत्ताप्रप्तीही होत असे.
मात्र अशा दीर्घकालीन आणि प्रबळ सत्तेमुळे संघटनेत दोष निर्माण होऊ लागतात. गटबाजीला ऊत येतो. कारण प्रत्येक गट प्रबळ केंद्रीय नेतृत्वाच्या मर्जीसाठी आसुसलेला असतो. पक्षात आयारामांची आयात विधिनिषेधशून्य रीतीने होते. सत्तेचा उन्माद खालच्या स्तरापर्यंत झिरपतो; कारण नेतृत्वानेच तसे वातावरण निर्माण केलेले असते.
आपल्याखेरीज पर्याय नाही आणि आपली सत्ता कायमसाठी आहे असा आभासी उन्माद उत्पन्न झाला की पक्ष संघटनेत अल्पसंतुष्टता येऊ लागते; सत्ता मिळणारच आहे मग परिश्रमांची गरज काय अशी भावना बळावू लागते.
हे दोष एका रात्रीत निर्माण होत नाहीत आणि लवकर दृग्गोचरही होत नाहीत. मात्र, त्या घसरणीची लक्षणे दिसू लागलेली असतात. त्यावर उपाय योजले तर संघटनेची तटबंदी ढासळण्यापूर्वी पुन्हा भक्कम करता येण्याची शक्यता असते.
अर्थात, सामान्यतः अशा दोषांकडे प्रबळ नेतृत्व दुर्लक्ष करते कारण आपल्या करिष्म्यावर नेतृत्वाला अतिरेकी आत्मविश्वास असतो. त्यामुळे संघटनेत शिरलेले दोष अधिकाधिक गंभीर होत जातात आणि अखेरीस सत्ता जातेच; पण संघटन अशा स्थितीला पोहोचलेले असते की त्यात दुरुस्ती करणे हे अशक्य पराकोटीतील काम होऊन जाते.
कॉंग्रेस या सर्व टप्प्यांतून गेली आहे आणि आज कॉंग्रेसला जी अवनती प्राप्त झाली आहे त्यामागे संघटनेतील दोषांकडे वेळीच लक्ष न पुरविणे आणि संघटनेवर सत्ता वरचढ ठरणे ही प्रमुख कारणे आहेत. कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपने दिली असली तरी मुळात कॉंग्रेसने आपली ही स्थिती स्वतःच करून घेतली आहे.
भाजप आता त्याच टप्प्यांतून जात आहे आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने भाजपने वेळीच लक्ष दिले नाही तर त्या पक्षाची स्थिती कालांतराने कॉंग्रेससदृश झाल्यास आश्चर्य वाटावयास नको.
भाजपमध्ये अनेक राज्यांत गटबाजीला ऊत आला आहे. मुख्य म्हणजे ती गटबाजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आणि ज्या तृणमूल कॉंग्रेसमधून निवडणुकीपूर्वी भाजपने भरजोर आयात केली होती तेच आयाराम आता भाजपला सोडचिठ्ठी देण्यास आतूर झाले आहेत.
मुकुल रॉय यांनी आपल्या चिरंजीवांसह तृणमूलमध्ये वापसी केली आहेच; पण अनेकांनी जाहीरपणे तृणमूलमध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तेव्हा भाजप संघटनवृद्धी करण्याचे दावे करीत होता ते किती पोकळ होते हे कळावयास पश्चिम बंगालमधील एक पराभव पुरेसा ठरला. तेथील भाजप नेत्यांमध्ये देखील एकवाक्यता नाही.
तथागत रॉय यांनी अभिनेत्रींना भाजपमध्ये घेण्याच्या निर्णयावर टीका केलीच पण भाजपचे पश्चिम बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनादेखील लक्ष्य केले. जे त्या राज्यात तेच केरळमध्ये. सर्व क्लृप्त्या करूनही भाजप तेथे एकही जागा जिंकू शकला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांच्यावर एका छोट्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येण्यासाठी लाच दिल्याचा आरोप झाला आहे.
भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आलेल्या प्रचारनिधीची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप केरळ भाजप शाखेवर आहे आणि भाजपने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. सुरेंद्रन आणि केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या कार्यशैलीवर त्यांच्या सहकाऱ्यांनीच टीकेची झोड उठविली आहे.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्यावर भाजपमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भाजपमधील अनेकांनी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य व्यवस्थांच्या भीषण स्थितीविषयी नाराजी व्यक्त केली होती.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य करून एका अर्थाने आपल्या महत्त्वाकांक्षा उघड केल्या आहेत. कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही.
ते आणि त्यांचे चिरंजीव यांनी कर्नाटक भाजपची सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत, असे नाराजीचे सूर निघत असतात. कर्नाटक विधान परिषदेतील एक आमदार विश्वनाथ यांनी आपल्याच सरकारवर हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या कोविड चाचण्यांमध्ये कथित घोटाळ्याशी आपला संबंध नसून आपल्या अगोदरचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या राजवटीतील ते प्रकरण आहे, असे सांगून एका अर्थाने तीरथसिंग रावत यांनी जबाबदारी ढकलली असली, तरी अजाणतेपणे त्यांनी गटबाजी उघड केली आहे.
मुंबई महानगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक आहे आणि तेथे भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही अशी वृत्ते येत असतात. या सर्व घडामोडी भाजपमधील वाढती सत्तालोलुपता याचीच लक्षणे आहेत. स्थिती गंभीर नाही अशी सारवासारव भाजप नेते करतीलही. पण छिद्रे वेळीच बुजविली नाहीत तर जहाजात पाणी वाढू शकते.
मग जहाज कितीही मोठे असले तरी ते तग धरू शकत नाही. सत्तेचे सुकाणू महत्त्वाचे असते; पण संघटनेचे सुकाणू व्यवस्थित असणे अधिक गरजेचे आणि दीर्घकालीन हिताचे असते. सत्ताकेंद्रित संघटनेपेक्षा सत्ताकांक्षी संघटन असणे अधिक श्रेयस्कर याचे भान कॉंग्रेसने ठेवले नाही; भाजप ते ठेवतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.