नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून दिल्लीला जुलै महिन्यासाठी केवळ 15 लाख लसींच्या डोसचाच कोटा देण्यात आला आहे. अशाच प्रमाणात दिल्लीवर अन्याय होत राहिला तर संपुर्ण दिल्लीेचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी आणखी किमान 16 महिन्यांचा अवधी लागेल असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारचा हा लसीकरणाचा कार्यक्रम म्हणजे गोंधळाचा आणि अव्यवस्थेचा कार्यक्रम ठरला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने 21 जून पासून जगातला सर्वात मोठा मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केल्याची थाटात घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र हा पुर्ण फसलेला कार्यक्रम ठरला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
या सरकारने लसीकरणाच्या संबंधात जे जे योजले आहे त्यातील प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे हा डिरेल प्रोग्रॅम ठरला असल्याची टीकाहीं सिसोदिया यांनी केली आहे.