विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर तशीच काहीशी अवस्था चाळीतल्या अनेक बिऱ्हाडांची होती. बिऱ्हाडाच्या व्यतिरिक्तही चाळीच्या खोल्यांचा वापर इतर अनेक प्रकारे केला जात असे. पश्चिम महाराष्ट्रातून आलेले घाटीबांधव सहसा मुंबईत एकटेच राहत. शेतीच्या कामांसाठी त्यांचे कुटुंब गावाकडे मागे राहत असे.
या सडाफटिंग गड्यांच्या सोयीसाठी प्रत्येक गावाने आपल्या मालकी हक्काची एक रूम कोणत्या ना कोणत्या चाळीत घेऊन ठेवलेली होती. मोठ्या प्रेमाने या रूमला “बैठकीचा गाळा’ असे म्हणत असत. पोरगा कमवायच्या वयात आला की गावाकडून त्याला दोन पैसे कमवायला मुंबईकडे ढकलले जाई.
मुंबईत पोहोचलेल्या या जिवाला आधार याच बैठकीच्या खोलीचाच होता. आजकाल कोणी विचारही करू शकणार नाही एवढे गावकरी या एका गाळ्यात गुण्यागोविंदाने नांदत असत. मी पैजेवर सांगतो, इथे राहणाऱ्या माणसांची संख्या तुम्ही नक्की चुकीचीच सांगणार. अहो, एकावेळी या एका गाळ्यात कमीतकमी पन्नास माणसांचा बारदाना रचून ठेवलेला असायचा. इथे बारदाना म्हणजे गाळ्यात राहणाऱ्या माणसाचे सामान.
शक्यतो एका धोपटीत एक कपड्यांचे दोन जोड, त्यांच्यासोबत झोपायची वळकटी, एवढाच काय तो प्रत्येकाचा संसार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी सारी माणसे रात्री एवढ्याशा जागेत कशी मावणार? त्यासाठी तुम्हाला मुंबईतल्या मिल आणि तिथल्या तीन पाळ्यांची वेगळी ओळख करून घ्यावी लागणार आहे. थोडक्यात, या तीन पाळ्यात या गाळ्यातली मंडळी विभागलेली असायची. शिवाय चाळ संस्कृतीमध्ये घरांपेक्षा वऱ्हांडा, पटांगण अशी बाहेरची मोकळी जागा झोपण्यासाठी वापरली जात असे. त्यामुळे गाळ्यात रात्री झोपायची कधी गैरसोय होत नसे.
पश्चिम महाराष्ट्राच्या या रांगड्या गड्याला मुळात कुस्तीची भारी आवड. हा घाटावरचा गडी मुंबईत येऊन एकतर बोळे पुसणार (रंगाच्या कामात असलेल्या लोकांना त्यांच्या गावात बोळे पुसणारे म्हणून ओळखले जात असे) किंवा मिलमध्ये काम करणार. या व्यतिरिक्त तिसरा गट असाही होता की ज्याला मनापासून पैलवान व्हायचे होते; पण प्रपंचांची गरज म्हणून मुंबई गाठावी लागली होती.
या तिसऱ्या वर्गासाठी बऱ्याचशा चाळीमध्ये तळमजल्यावर रूम घेऊन पद्धतशीरपणे तालीम तयार केली होती. हा तिसरा वर्ग आपल्या कामाच्या वेळा सोडून या तालमीत दम घुमवत असे. गोकुळ अष्टमीसारख्या काही महत्त्वाच्या दिवशी गाळ्यातल्या या जनतेला चाळकऱ्यांकडून अनन्य साधारण महत्त्व मिळत असे.
चाळीचा वऱ्हांडा म्हणजे एक बहुउपयोगी जागा होती. घरातल्या वयस्कर व्यक्तींना मोकळी हवा मिळावी म्हणून त्यांना बसण्यासाठी एखादी खुर्ची किंवा बाकडे इथेच विसावलेले असायचे. घरातल्या माणसांच्या संख्येवर पाण्याचा साठा करणारी भांडी याच वऱ्हांड्यात ठाण मांडून बसलेली असायची. रात्रीच्या वेळेस या जागेचा बेडरूम होत असे, हा उपयोग वेगळाच होता.
अधूनमधून जास्तीचे पाहुणे आले तर आजूबाजूने खुर्च्या जमा करून याच जागेत पाहुण्यांची खातीरदारी केली जात असे. या सगळ्या अडचणीतून जागा काढून चाळीतील समस्त बालवीर या जागेलाच कधी क्रिकेटचे मैदान, तर कधी कुस्तीचा आखाडा, तर कधी कबड्डी, लंगडीचे मैदान करीत असत. घरांच्या दरवाजाच्या मागे लपत लपाछपी खेळले नाही, असे बालक शोधूनही सापडणार नाही.
प्रेमात पडलेल्या तरुण तरुणींना ही जागा म्हणजे वरदान होते. आपल्या वऱ्हांड्यात येऊन आजूबाजूला झाडी मारत आपल्या आवडत्या व्यक्तीला सांकेतिक भाषेत किंवा नजरेच्या इशाऱ्याने संदेशांची देवाणघेवाण करताना हा वऱ्हांडा या प्रेमिकांना चिनार वृक्षापेक्षा जवळचा वाटत असे.
कोकणातून आलेला चाकरमानी या चाळीत आपल्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासह राहत असे. चाळीच्या एकाच खोलीत दोन-तीन पिढ्या एकत्र नांदत असत. गणपती आणि होळी या दोन सणांना भाऊच्या धक्क्याला जत्रेचे स्वरूप येत असे. रस्ते वाहतूक प्रगल्भ होईपर्यंत आणि “गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे येस्टी’ हे समीकरण वास्तवात येईपर्यंत या चाकरमान्यांना भाऊच्या धक्क्यावरून सुटणाऱ्या बोटीचाच आसरा होता.
गणपतीच्या पाटांपासून ते घर झाडण्यासाठी केरसुणीपर्यंत, चहा बुक्की (पावडर) पासून साबणाच्या वड्यांपर्यंत, एकूण एक सामान या बोटीच्या आसऱ्याने कोकणात पोहोचत असे. झाडून सारा कोकण गावाला पोहोचल्यानंतर पटकीच्या साथीत उठून गेलेल्या गांवांसारखी या चाळींची अवस्था होत असे. मित्रांनो, आजही जिथे म्हणून चाळीत चाकरमानी शिल्लक आहे तिथे अगदी हेच नाही तरी थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसते.
मुंबईला व्यापार शिकवणारे गुजराथी, बोहरी, सामिष आहाराची व्यवस्था करणारे खाटीक असे अनेक वर्ग या मुंबईत राहत होते. मुळात मानव हा समाजप्रिय असल्याने तो आपल्या समाजाला धरून राहतो. मुंबईतले हे बाकीचे समाज आपापल्या भाऊबंधांना जवळ ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार फरकाने हेच जीवन जगत होते. त्यांच्या चाळीत काही सुविधा जास्त होत्या तर काही कमी.
हो, चाळीची अजून एक महत्त्वाची ओळख तुम्हाला सांगायचीच राहिली. बंद दारामागे स्वत:ला बंद करून घेणारी फ्लॅट संस्कृती अजून उदयाला यायची होती. चाळीच्या कोणत्याच खोलीचा दरवाजा रात्री झोपायची वेळ सोडली तर कधीच बंद व्हायचा नाही. सगळा खुल्ला मामला असला तरी उगाचच दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायची खोड कोणालाही नव्हती.
घडणारी प्रत्येक गोष्ट डंकेकी चोट पर घडली, तरी नसत्या चौकशा कोणीच करीत नसे. कोणालाही कसल्याही मदतीची गरज लागली तर न बोलावता अख्खी चाळ मदतीला जमा होत असे. सगळे सण, उत्सव मिळून मिसळून साजरे केले जायचे. घरात बनवलेल्या जेवणाचे आदान-प्रदान चाळीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रोजच्या रोज व्हायचे. अठरा पगड जातीच्या निरनिराळ्या लोकांची ही एक आदर्श वसाहत होती, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
1982 च्या संपानंतर चाळीतले अनेक चाळकरी चाळीला रामराम ठोकून गावाकडे गेले. कोकणातल्या चाकरमान्यांनी मिलला रामराम केला आणि इतर आस्थापनांमध्ये आसरा घेतला. चाळीतली खोली विकून आलेल्या पैशात दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुंबईत स्थलांतरित होऊन “न्यूक्लिअर फॅमिल्या’ करून राहू लागला.
दिवसाचे चोवीस तास खुल्ले असणारे चाळीचे दरवाजे, बंद दरवाजाची नवीन संस्कृती अंगीकारू लागले. सदासर्वदा जागरूक असलेली चाळ आता वाट पाहते आहे. स्वत:चेच गतवैभव आळवत, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारते आहे, भूतकाळात अनुभवलेले गतवैभव पुन्हा फिरून प्राप्त होईल का? आजच्या पिढीला हे सारे पचनी पडायला अंमळ जडच जाणार आहे.
– डॉ. नरेंद्र कदम