राजगुरूनगर – महाविकास आघाडीत काही बंधने आहेत; मात्र येथील आमदारांच्या वागण्याची पद्धत अशीच असेल तर पुढच्या निवडणुकीत महाआघाडी असेल नसेल या मतदार संघात शिवसेनेचाच उमेदवार राहील. तो कसा निवडून आणायचा यासाठी आम्हाला माहिती आहे. जर खुनशी राजकारण करीत असाल परंपरेला शोभत नसेल तर शिवसेना खंबीर आहे. स्थानिक आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ऐकत नसतील तर पुढची भूमिका आम्ही ठरवू, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
खेड तालुक्यात पंचायत समितीच्या इमारतीवरून चाललेल्या राजकीय वाद आणि सभापतींवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार संजय राऊत हे या घटनेची माहिती त्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज (शुक्रवारी) खेडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
राऊत म्हणाले, खेड तालुक्याच्या राजकारणात दिलीप मोहितेंचा वारू नेहमीच उधळलेला असतो; मात्र शिवसेनेने बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा शिवसेना प्रतिष्ठेचा लढा लढते. वाघाच्या शेपटीवर पाय देणाऱ्याची गय केली जाणार नाही.
अण्णा बनसोडेंच्या मुलाला काळा बुरखा का नाही? –
खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापतींना अटक झाल्यानंतर पोलीस काळा बुरखा घालून मीडियासमोर आणतात; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने गोळीबार केला त्याला काळा बुरखा का घातला नाही. याची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
त्या सदस्यांबाबत निर्णय घेतलाय
खेड पंचायत समिती सभापती यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी आणि तो केल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सहलीला गेलेल्या सदस्यांबाबत आणि डोणजे (पुणे) येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत शिवसेनेकडून कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. शिवसेनेच्या त्या सदस्यांबाबत निर्णय आम्ही घेतला आहे. असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.