नवी दिल्ली – भारतातील पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लाऊन विदेशात फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमनिकाहून भारतात आणण्यासाठी पाठवण्यात आलेले विशेष विमान भारतात रिकाम्या हाताने परतले आहे.
या विमानातून काही भारतीय अधिकारी तिकडे कागदपत्रे घेऊन पाठवण्यात आले होते. परंतु चोक्सी हा डॉमनिकातील खटल्यात अडकल्याने त्याला भारतात परत आणता आलेले नाही, असे कारण आता यासाठी पुढे केले जात आहे.
या विमानासाठी भारत सरकारला तब्बल तीन कोटी रुपये खर्च आला आहे. कतार एअरवेजकडून हे विमान भाड्याने घेण्यात आले होते. त्याचे दर तासाचे भाडे तीन लाख रुपये इतके आहे. 28 मे रोजी हे विमान तिकडे पाठवण्यात आले होते ते विमान गुरुवारी रात्री भारतात हात हलवत परतले.
तथापि, भारतीय विमान कंपन्यांकडे विमाने उपलब्ध असताना कतारचे विमान भाड्याने कशासाठी नेण्यात आले होते, हाही एक नवीन प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. चोक्सी हा पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लाऊन अँटिग्वा या देशात फरारी झाला होता.
त्याने त्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. तथापि, अँटिग्वा देशाने त्याला परत घेऊन जाण्याची अनुमती भारताला मध्यंतरी दिली होती. परंतु तरीही चोक्सीने तेथे कोर्टाचा आधार घेत या कारवाईला मोडता घातला. नंतर तेथून तो डॉमनिका देशात पळून गेला.
तेथे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आमच्या देशात परत न आणता परस्पर भारतातच घेऊन जा, अशी सूचना अँटिग्वाच्या सरकारने केली आहे. पण डॉमनिकातही त्याच्या विरोधात विविध कारणाने खटले दाखल करण्यात आल्याने आता तो तेथेच अडकून पडला आहे. आमचा अशील आता भारताचा नागरिक नाही, त्यामुळे त्याला भारतात धाडण्यात येऊ नये, अशी भूमिका त्याच्या वकिलाने तेथील न्यायालयात मांडली आहे.