नवी दिल्ली – यंदाच्या वर्षी आशिया करंडक स्पर्धा रद्द झाली असली तरीही जर पुढील वर्षी ही स्पर्धा झाली तर त्याचे यजमानपद पाकिस्तानकडेच राहणार आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला जावेच लागणार आहे; अन्यथा आयसीसीकडून बीसीसीआयवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
यावर्षी होणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही रद्द करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत जून महिन्यात होणार होती. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळे ही स्पर्धा आता रद्द करण्यात आली आहे. पण पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळवण्यात आली तर त्याचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे.
गेली दोन वर्षे ही स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळवावी लागेल. त्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून, आता भारतीय संघाला तिथे जाऊन खेळावे लागू शकते. याबाबत बीसीसीआय नेमका काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे असेल. कारण आतापर्यंत बीसीसीआयने पाकिस्तानबरोबर मालिका खेळण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यामध्येच भारतीय संघाला बीसीसीआय पाकिस्तानमध्ये खेळायला पाठवेल, असे सध्याच्या घडीला तरी वाटत नाही.
सध्याच्या घडीला करोनामुळे श्रीलंकेत आशिया करंडक स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीही करोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा खेळवणे संभव नसल्याचे सांगितले आहे.
सध्याच्या घडीला करोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी आशिया चषक स्पर्धा खेळवणे योग्य ठरणार नाही. आता या स्पर्धेचे आयोजन 2023 साली होणाऱ्या क्रिकेट विश्वकरंडकानंतर होऊ शकते. कारण यापुढील दोन वर्षे सर्व देशांचे कार्यक्रम व्यस्त आहेत.