मुंबई, दि. 17 – करोना लसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्तेनवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल करतानाच लोकांचा आवाज दाबण्याची ही मोदी सरकारची कायरता आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघूया, असे आव्हानही त्यांनी यावेळी भाजपला दिले.
मीडियाशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी हा हल्ला चढवला. दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरू बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही, त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्र सरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे, तर काही जण पाच कोटी कम्पलसरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाही तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे मलिक म्हणाले.
मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत, तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्र सरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करून अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय, किती लोकांना अटक करणार मोदीजी?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.