मुंबई – इंधनाची एकतर्फी दरवाढ आता विविध वस्तूंच्या किमतीवर परिणाम करू लागली आहे. एप्रिल महिन्यात घाऊक किमतीवरील महागाई निर्देशांक आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 10.49 टक्के इतका नोंदला गेला आहे. त्यामुळ सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
महागाई वाढण्याची ही तर केवळ सुरुवात आहे. आगामी काळात महागाई वाढत जाण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या आघाडीवर रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालयाने तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
महागाई वाढली की व्याजदर वाढतात. व्याजदर वाढले की कर्जाचा उठाव कमी होतो. परिणामी अर्थव्यवस्थेला खेळ बसते. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. यानुसार पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य आणि उत्पादित वस्तूंची महागाई वाढल्यामुळे एकूण महागाई निर्देशांकात वाढ झाली आहे.
एप्रिल महिन्यात प्रोटीनयुक्त पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर भाजीपाला आणि फळांचे दर वाढले आहेत. या संबंधात बोलताना ईक्रा या संस्थेच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, अन्नधान्याच्या किमती सहा महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेल्या आहेत. महाग इंधन आणि प्रवासातील अडथळ्यामुळे अन्नधान्याच्या किमती आता वाढू लागल्या आहेत.
घाऊक महागाईचा दर मे महिन्यामध्ये 13.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा इशारा त्यांनी दिला. डाळी, फळे, अंडी, मासे त्या प्रोटीनयुक्त पदार्थांबरोबरच धातू, कोळसा, खते, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढत गेली आहे.
जागतीक बाजारातही महागाई अवतरली असून आगामी काळात याचाही भारतीय महागाईवर परिणाम होऊ शकतो. रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत तरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत.
मात्र घाउक महागाईबरोबर किरकोळ किंमतीवर आधारीत महागाई वाढली तर रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. किंबहुना काही बॅंकांनी आपल्या काही व्याजदरात अगोदरच वाढ केली आहे. जर व्याजदर वाढले तर भांडवलाचा वापर कमी होऊन आपल्या जास्त विकास दराच्या स्वप्नात बाधा येऊ शकते असे विश्लेषक मानतात.