नवी दिल्ली – आता करोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका गडद झाली आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी खबरदार केले की, तिसरी लाट येणार आणि नक्की येणार, ही लाट येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अर्थात तिसरी लाट केव्हा येणार याबाबत मात्र नक्की काहीच सांगता येणार नाही. त्यासाठी आपण तयारीत असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तिसरी लाट का येणार?
के. विजय राघवन यांनी सांगितले की, करोना विषाणू आपले रूप बदलत असतो. जेव्हा करोनाचे लसीकरण वाढेल तेव्हा संसर्ग वाढवण्याचा नवीन मार्ग हा विषाणू शोधेल. करोनाचे नवीन रूप म्हणजे नवीन व्हॅरिएन्ट तयार होऊ शकतात, हे माणसांच्या रोगप्रतिकार क्षमतेला चकवू शकतील. दुसऱ्या लाटेच्या वेळेस असेच पाहण्यात आले आहे. ज्या लोकांमध्ये करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर अँटिबॉडीज तयार झाल्या किंवा लस घेतल्यानंतर रोगप्रतिकार क्षमता तयार झाली त्या लोकांनादेखील करोनाचा पुन्हा संसर्ग होतो आहे.
दुसरी लाट केव्हा संपणार?
करोनाची दुसरी लाट मे महिन्यात उच्चांकीवर पोहोचण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे मॅथेमॅटिकल मॉडेलिंग एक्सपर्ट प्रोफेसर एम. विद्यासागर यांच्यानुसार करोनाची दुसरी लाट पुढील आठवड्यापासून कमी होण्यास सुरुवात होईल. विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार 7 मे रोजी दुसरी लाट उच्चांकीवर असू शकते आणि त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात होऊ शकते.
तिसरी लाट दुसरीपेक्षा जास्त धोकादायक?
तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असणार की नाही यावर आत्ताच निश्चित काहीच सांगता येणार नाही. जर योग्य पद्धतीने लसीकरण वेगाने करण्यात आपल्याला यश आले तर तिसरी लाट कमी धोकादायक ठरेल.
सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी बुधवारी तिसऱ्या लाटेबद्दल इशारा दिला. मात्र, सीएसआयआरचे संचालक शेखर सी. मांडे यांनी फेब्रुवारी महिन्यातच याचा इशारा दिला होता की, करोनाच्या तिसरी लाटेसाठी तयार राहिले पाहिजे. त्यांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्याबद्दल इशारा देताना म्हटले होते की जर तिसरी लाट आली तर तिचे परिणाम फारच भयावह असतील.
तिसरी लाट केव्हा येऊ शकते?
नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-चे सदस्य असलेले डॉ. एन. के. अरोरा यांनी तिसऱ्या लाटेच्या वेळेबद्दल सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मे महिन्याच्या मध्यास करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक आल्यानंतर 4 ते 5 महिन्यांपर्यंत करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत जाईल. त्यानंतर पुन्हा यात वाढ होऊ शकते. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरदरम्यान तिसरी लाट सुरू होऊ शकते. वेगवेगळ्या राज्यात ही लाट वेगवेगळ्या वेळेस येऊ शकते. पहिल्या लाटेचा उच्चांक सप्टेंबरमध्ये आला होता. त्यानंतर 4 महिन्यापर्यंत संसर्ग कमी होत गेला आणि फेब्रुवारीत पुन्हा दुसरी लाट आली.
तिसऱ्या लाटेपासून कसे वाचायचे?
मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. मात्र, त्याचबरोबर यावरचा उपायसुद्धा सांगितला आहे. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल. तिसरी लाट येण्यास 5 ते 6 महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यत युद्धपातळीवर लसीकरण करण्याची आवश्यकता आहे.