नवी दिल्ली – सध्या भारतात वाढलेल्या करोनाच्या कठीण परिस्थितीमुळे काही देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सध्या आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंपुढे मोठे प्रश्न आहेत. असे असले तरी बीसीसीआय परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे मायदेशी पाठविण्याठी मार्ग काढेल, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.
यंदाचा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर परदेशी खेळाडूंना त्यांच्या मायदेशी कसे पाठवणार याबद्दल विचारले असता आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू हे सुरक्षित वातावरणात आहेत. आता स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने त्यांना घरी पाठण्याची गरज आहे. यासाठी आम्ही लवकरच मार्ग शोधून काढू. तसेच बीसीसीआय, ईसीबी आणि संबंधित देशातील अधिका-यांशी संपर्क साधून खेळाडूंना परत पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. मात्र, तपशीलवार माहिती देण्याचे टाळले.
दरम्यान, आयपीएलचा 14 वा हंगाम सुरू असतानाच काही परदेशी खेळाडूंनी माघार घेत आपल्या मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळणे कायम केले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांसाठी त्यांच्या देशाचा सीमा 15 मेपर्यंत बंद केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्दल तसेच अन्य परदेशी खेळाडूंबद्दल बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 14, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 11, न्यूझीलंडमधील 10, वेस्ट इंडिजचे 9, अफगाणिस्तानचे 3 आणि बांग्लादेशचे दोन खेळाडू होते. याशिवाय अनेक माजी खेळाडू हे सहाय्यक कर्मचारी आणि समालोचन संघात होते.