राहू -दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात करोनाचे अनेक रुग्ण असताना राहू प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेताना करोनाचा चेंगरून मृत्यू झाला, अशी मार्मिक कोटी केली जात आहे. येथील केंद्रात कोणाचा पायपोस कोणाला नाही. सोशल डिस्टन्स नावापुरताच राहिला आहे, इतकी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार पाहून “रोगापेक्षा इलाज भयंकर’, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
डॉ. मोहन पांढरे म्हणाले की, साधारणपणे आम्हाला 200 डोस मिळत आहेत. मग 200 डोस असताना इतकी गर्दी करून काय उपयोग आहे.आम्ही टोकन दिले आहेत. पण लोक ऐकत नाहीत. आम्ही गर्दीचे नियोजन करीत थांबलो तर पुढच्या प्रक्रिया होऊ शकत नाहीत. याबाबत ग्रामपंचायतीला कल्पना देखील दिली होती. त्यांनी देखील प्रयत्न केला आहे.
परंतु लोक विनाकारण गर्दी करीत आहेत.सरपंच दिलीप देशमुख म्हणाले की, मी स्वतः व पोलीस पाटील मिळून सकाळी व्यवस्थित नियोजन केले होते. टोकन वाटप केले होते. परंतु लोक शिस्त पाळत नाहीत. त्यासाठी होमगार्डची सेवा घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक कोविड सेंटरला त्यांची सेवा असल्यामुळे ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पुढील वेळेस गावातील तरुण मंडळाकडे हे काम दिले जाणार आहे. लस कमी आणि येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे जास्त गोंधळ होत आहे.