नवी दिल्ली, दि. 30- दिल्लीत करोनाचे संकट हाताबाहेर गेल्यानंतर आम आदमी पार्टीमध्ये असंतोष वाढतो आहे. आम आदमी पार्टीचे आमदारच आता केजरीवाल सरकार करोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
आपचे वरिष्ठ नेते आणि आमदार शोएब इकबाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील स्थिती गंभीर आहे. केजरीवाल सरकार करोना संकटाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती शासन लागू झाले पाहिजे.
दिल्लीत वैद्यकीय साधनांच्या वितरणाची योग्य व्यवस्था नाही. करोनाच्या रुग्णांना जी औषधे आवश्यक आहेत, ती त्यांना मिळत नाहीत. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आम्ही कोणाशी बोलावे. आमचे ऐकणारा कोणी नाही. दिल्ली सरकारच्या हाताबाहेर परिस्थिती गेली आहे. राष्ट्रपती शासन लागू करा, अशी मागणी मी केली आहे.
मी पक्षातील सर्वात वरिष्ठ आमदार आहे, मात्र करोनाच्या संकटावर माझे मत विचारात घेतले जात नाही. या संकटासंदर्भात पक्षात कोणतीही बैठक घेतली जात नाही. दिल्लीत लढाईविनाच रस्त्यावर मृतदेह विखुरले आहेत. देशात सर्वात वाईट परिस्थिती दिल्लीची आहे, असे मत शोएब इकबाल यांनी व्यक्त केले आहे.