मुंबई – गेल्या महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणामुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यापर्यंत असल्याची चर्चा मध्यमांमध्ये सुरू होती. त्यातच सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवून २८ एप्रिलला जबाब नोंदविण्यासाठी मुंबईत उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. यावर शुक्ला यांनी मेल पाठवून सध्याच्या स्थितीत चौकशीला उपस्थित राहणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
इमेल पाठवून शुक्ला म्हणाल्या की, सध्याची कोविड स्थिती आणि हैद्राबादमधील कामाचा व्याप पाहता मुंबईला प्रवास करून चौकशीला उपस्थित राहणं शक्य नाही. मात्र चौकशी संदर्भातील प्रश्नावली मला पाठवून द्या, मी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच या प्रकरणी दाखल एफआयआरची प्रतही पाठवून द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. शुक्ला यांनी त्यांचा मेल आयडी आणि लँडलाईन क्रमांकही दिला आहे. आपण यावर उपलब्ध राहू असं त्यांनी मेलमध्ये सांगितलं.
बीकेसी सायबर पोलिसांकडून ठाण्यात फोन टॅपिंगबद्दल दाखल गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शुक्ला यांना समन्स बजावण्यात आलं होतं. कोविडची स्थिती पाहता रश्मी शुक्ला यांचा जबाब त्यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी नोंदविण्यात येणार होता. भारतीय टेलिग्राफी ऍक्ट कलम ३० माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३ व ४६ ऑफिशीयल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत शुक्ला यांना समन्स बजावण्यात आलं आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक असून हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.