गया – एका 58 वर्षीय हिंदू महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या संशयावरून तिच्या कुटुंबीयांनी मृतदेहास हात लावण्यास नकार दिल्याने मुस्लीम समाजातील युवकांनी पार्थिवावर अग्निसंस्कार केले.
गया जिल्ह्यातील तेतारिया गावात हा प्रकार घडला. या गावातील प्रभावती देवी यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचा मृत्यू करोनाने झाला असावा असा संशय डॉक्टरांना होता.
राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाची लाट ओसरणार पण…
त्यांची प्रकृती ढासळत असताना डॉक्टरांनी त्यांना करोना चाचणी करून घेण्यास सांगितले. त्यांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात आली ती निगेटिव्ह आली. मात्र उपचार सुरू असताना त्या मरण पावल्या.
कुटुंबीयांना त्यांचा मृत्यू करोनामुळे झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहास हात लावण्यास नकार दिला. हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह वाहनात नेऊन ठेवण्याची व्यवस्था केली. मात्र पती आणि त्यांच्या दोन मुलांनी मृतदेहाचा ताबा घेतला नाही. शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मृतदेह तसाच पडून होता.
सामाजिक कार्यकर्ते महंमद शरीक म्हणाले, आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अंत्यसंस्कार करावे अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ते तरीही अंतर ठेवून वावरत होते. अखेर मुस्लीम युवकांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढला. बांबू आणले तरी तिरडी बांधली. आम्ही स्मशानभूमीत मृतदेह नेऊ लागलो त्यावेळी कुटुंबीयांना त्यांची चूक उमगली आणि ते खांदा द्यायला पुढे आले.
मृत महिलेच्या मुलाने माध्यमांशी बोलताना मुस्लीम समाजातील या तरुणांचे आभार मानले आणि हिंदू मुस्लीम एकतेचे हे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले.