अरुण गोखले
आज प्रत्येक माणूस ज्ञानी आहेच. प्रत्येकालाच कशाचे ना कशाचे तरी उत्तम ज्ञान आहेच. प्रत्येकाच्या अंगात कोणते ना कोणते तरी कलाकौशल्य आहेच. एकूणच काय तर आपण सारेजण आज सुशिक्षित आहोत. ज्ञानाची अनेक दालने आज आपणच आपल्यासाठी उघडी केली आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रातली माणसाची झेप म्हणजे एक गरूडभरारी म्हणावी लागेल. तंत्रज्ञाच्या क्षेत्रात तर त्याने परग्रहांवरही पाऊल ठेवीत आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. वैद्यकीय शास्त्र, शल्य चिकित्सा, औषधोपचार ह्याच्या जोरावर माणसाने जरी मृत्यूवर मात केलेली नसली तरी त्याने तो काही काळासाठी का होईना पण निश्चितपणे लांबविला आहे.
एकूणच काय, तर ज्ञानाच्या बाबतीत आम्ही चार पावले अधिकच पुढे आहोत. आम्ही ज्ञानाच्या, विज्ञानाच्या साधनसुविधांचा उपलब्धतेमुळे आमचे जीवन सुखकर केले आहे. इच्छा करतात अनेक गोष्टी आमच्या समोर हजर होतात. मग आम्ही हे एवढं सारं ज्ञानाच्या बळावर केले असतानाही काही खऱ्या मानवी हितचिंतकांचा हा आग्रह मात्र का, की तुम्ही फक्त ज्ञानी नव्हे तर आत्मज्ञानी व्हा.
आज जगात ज्ञानी सगळेच आहेत, पण आत्मज्ञानी मात्र फार कमी आहेत. आम्हाला आमची सामाजिक, व्यावहारिक ओळख असते. पण स्वत:ची एक माणूस म्हणून ओळख नसते. आमचं माणसा-माणसामधलं माणुसकीचं नातं दुरावत चाललेलं आहे. ज्ञानाने आम्हाला अहंकारी, गर्विष्ठ, आत्मकेंद्रित, स्वार्थी आणि मतलबी बनविले आहे. आम्ही आज दुसऱ्याचा कमी आणि स्वत:चा जास्त विचार करतो आहोत.
आम्हाला आम्ही जन्माला का आलोय ह्याचे भान राहिलेले नाही. मी कोण कोठून आलोय आणि मला परत कुठे जायचे आहे. माझ्या या प्राप्त जन्माचे खरे सार्थक कशात आहे. माझा माणूस म्हणून धर्म काय? माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता काय? या कशाचाच आज कोणालाच विचार करावा असे वाटत नाही. खर तरं आम्ही तिथंच मोठी चूक करतो आहोत. आम्ही जग ओळखायला, पाहायला आणि शोधायला निघालो आहोत. पण आम्ही आमचाच शोध कधी घेणार? आपला जन्म, आपलं जगणं, आपलं अस्तित्व हे कोणाच्या सत्तेवर आहे ह्याचा विचार केव्हा आणि कधी करणार? माणसाला माणसाची खरी ओळख हेच त्याचा आत्मज्ञानी होण्याची निशाणी आहे हे आम्हाला कधी कळणार?