मुंबई – राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्री 8 वाजतापासून 1 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू असणार आहे. कडक अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यात, आवश्यक त्या सर्व ठिकाणी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नवीन निर्बंधांनुसार, लग्न सोहळ्यासाठी दोनच तास आणि 25 जणांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवास हा केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करण्यास परवानगी राहील. त्याचबरोबर सरकारी कार्यालयात फक्त 15 टक्के उपस्थिती, खासगी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवेसाठी, लोकल;मेट्रो;मोनो प्रवास सर्वसामान्यांना बंद ठेवण्यात आला आहे. ओळखपत्र पाहूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे तिकीट मिळणार आहे. यासाठी रेल्वेस्थानकावरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असला तरिही ते गरजेचे असल्याचे शासनाने म्हटले आहे.