मुंबई – राज्यात आज 61,695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 53335 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2959056 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 620060 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.3% झाले आहे. तर दुसरी कडे करोना वाढीच्या या साखळीला तोडण्यासाठी महाराष्ट्र १५ दिवसाचे लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
मात्र राज्य सरकारने लावलेले लॉकडाऊन आणि ठाकरे सरकारच्या कोरोनाकाळातील कारभारावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.
नारायण राणे म्हणाले,’ राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश आले आहे. हे पाप ठाकरे सरकारचे आहे.देशातील एकूण मृतांपैकी ४१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
ते पुढे म्हणाले,’ सध्याच्या परिस्थितीत राज्याला लॉकडाऊन परवडणार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रावरही नारायण राणे यांनी टीका केली.