भोपाल – मध्यप्रदेशात करोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत असलेल्या सुमार आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात कॉंग्रेस आमदारांनी आज रिकाम्या ऑक्सीजन सिलेंडरसह मूक निदर्शने केली. पीसी शर्मा, जीतू पटवारी आणि कुणाल चौधरी या कॉंग्रेसच्या आमदारांनी भोपाळमधील मिंटो होलच्या प्रवेशद्वाराजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली.
मध्यप्रदेशात करुणा रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रेमडेसिविरचा तुटवडा भासू लागला आहे. याशिवाय आवश्यक वैद्यकीय उपकरणेही कमी पडू लागली आहेत. यासंदर्भात भाजप सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या आमदारांनी केला. मुख्यमंत्र्यांकडून गेल्या वर्षभरापासून आत्मनिर्भरतेबाबत वल्गना केल्या जात आहेत. मात्र त्यांचे हे दावे आता फोल ठरले आहेत. ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने आणि आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे असे पटवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोविड 19 बाबत राज्यात तरी स्थिती खालावली आहे. मात्र तरीही उपचारांसाठी आवश्यक महत्त्वाच्या औषधी बाबत सरकार निष्क्रिय आहे. मध्यपदेशातील या स्थितीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष द्यावे असे आवाहनही पटवारी यांनी केले. मध्यप्रदेशात मंगळवारी एकाच दिवसात 8 हजार 998 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.