संगमनेर (प्रतिनिधी) – करोना संकटाच्या काळात गोरगरीब व सर्वसामान्यांना थेट मदतीतून दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकाने पेट्रोल-डीझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. तसेच करोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा काळात महागाई वाढली असून, देशासह सीमेवर अस्थिरता निर्माण झाली आहे. हे केंद्र सरकारचे अपयश असल्याची टीका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करुन तहसीलदारांना निवेदन दिले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनूसार राज्यभर कॉंग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. संगमनेरमध्ये ही तालुका कॉंग्रेसच्या वतीने महागाई विरोधात तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सुरेश थोरात, नवनाथ महाराज आंधळे, अर्चनाताई बालोडे, संतोष हासे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, निर्मलाताई गुंजाळ, कचरू पवार, सुरेश झावरे, गणेश मादास, गौरव डोंगरे, शिवाजी जगताप, सौदामिनी कान्होरे, सुभाष कुटे, तात्याराम कुटे, बंटी यादव, प्रभाकर शेलार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारच्या धोरणामुळे कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले आहेत. देशात महागाईचा भडका उडाला आहे. आता आश्वासने नको, थेट कृती हवी. भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी, आशी मागणी निवेदनात केली आहे.