नवी दिल्ली -गेल्या आठवड्यात देशातील मोठ्या शहरात वाढलेल्या करोना रुग्णांची संख्या पाहिली असता नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊन फारसे उपयोगाचे नाही हेच सिद्ध होते. अशा प्रकारच्या उपाययोजनामुळे करोना रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर उद्योगधंद्याचे प्रचंड नुकसान होत आहे. यासाठी लॉकडाऊन न करता विविध उद्योगाच्या आणि सरकारी कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा वेगळ्या- वेगळ्या असाव्यात. या वेळांचे वर्गीकरण केल्यास शहरातील गर्दी कमी होईल असे व्यापाऱ्यांच्या संघटनेचे म्हणणे आहे.
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने अशा सूचनेचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला सादर केले आहे. या पत्रात संघटनेने म्हटले आहे की थेट नाईट कर्फ्यू किंवा लॉक डाउनमुळे रुग्ण कमी होण्यास मदत झाली आहे असे आकडेवारीतून दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने या विषयावर नावीन्यपूर्ण पद्धतीने विचार करण्याची गरज आहे.
जिल्ह्यासारख्या शहरांमध्ये कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्या केल्यास या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की रुग्णाच्या संख्येचे विश्लेषण केले असता सध्याच्या उपाययोजना लागू पडत नाहीत असे दिसून येत आहे.
ते म्हणाले की, उदाहरणादाखल सरकारी आणि खासगी कार्यालये सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत चालू असावी. तर दुकाने सकाळी 11 ते 5 या काळात उघडी असावीत. अशाप्रकारे स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून कामकाजाच्या वेळा वेगळ्या -वेगळ्या केल्या जाऊ शकतात.