आपल्याला घरी राहून चांगले कसे खाता येईल आणि चुकून चुकीचे खाणे कसे टाळता येईल ते पाहू. कारण आपल्याला आपलं आरोग्य आता छानच ठेवायचे आहे, आपली या साथीच्या रोगाशी लढायची ताकद वाढवायची आहे. कारण हे काही महिन्यात संपणार नाही युद्ध तर थोडं थोडं नंतरही चालू राहणार आहे. त्यात हा शत्रू आपल्या समोर कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण सज्ज राहणं जास्त महत्त्वाचं. चला मग घरी राहून आपण घरातलेच पदार्थ कसे आपलं आरोग्य वाढवतील ते पाहू.
आपण खातो तेव्हा फक्त त्याची चव कशी लागते यावर ते पदार्थ एकमेकांबरोबर खायचे की नाही हे ठरवतो; परंतु बऱ्याचदा काही पदार्थात असे घटक असतात की त्यांच्यामुळे दुसऱ्या पदार्थातील घटक नीट काम करू शकत नाहीत. जीवनसत्व आणि खनिजे अन्नामधून रक्तात मिसळण्यासाठी इतर घटकांची आवश्यकता असते. त्यावेळी ते दोन पदार्थ एक एकमेकांबरोबर खाणे गरजेचे असते.
म्हणून कशाबरोबर काय खायचं किंवा खायचे नाही ते आज जाणून घेऊया.
चहा पोळी हा नाश्ता अनेक वेळा आवडीने केला जातो; परंतु हा आहार अतिशय चुकीचा आहे. कारण चहा मधील टानिक ऍसिड पोळीमधील सत्व रक्तात मिसळू देत नाही.
कोणत्याही नाश्त्यानंतर किंवा खाण्याबरोबर चहा किंवा कॉफी घेऊ नये. रिकाम्या पोटी चहा घेऊ नये. फळांबरोबर चहा घेऊ नये. पालक भाजीबरोबर लिंबू घ्यावे. मसुराबरोबर लिंबू घ्यावे. पोहे खाताना आवर्जून लिंबू पिळावे त्यांनी पोह्यांची पौष्टिकता वाढते.
कोणत्याही पदार्थावर लिंबू पिळताना तो शिजत असताना पिळू नये त्याने त्यातील विटामिन नष्ट होते. तो पदार्थ खायला घेतल्यानंतर त्यावर लिंबू पिळावे. खाण्याबरोबर सोडा अजिबात पिऊ नये. पित्तशामक औषधे अति वापरल्याने कॅल्शियमचे अभीशोषण कमी होते व कॅल्शियमची शरीरात कमतरता भासू लागते. म्हणून त्यांचा सतत व अति वापर टाळावा, आंबट फळे व दूध यांचा एकत्र वापर टाळावा. दूध व मीठ यांचा एकत्र वापर टाळावा.
आता आपल्या रोजच्या जेवणात कशाने आपल्या शरीराला पोषण मिळते, ते पाहू. आपण वरण भात खातो. वरण भात तूप लिंबू ही अगदी उत्तम जोडी आहे. यातून योग्य प्रथिने, कर्बोदके, विटामिन क, योग्य फॅटस् मिळतात.
आपण पिठले भात खातो, त्यातही लिंबू पिळले व थोडे तूप घातले की चौरस आहारातील पौष्टिकता मिळते. उसळ पोळी व बरोबर कोशिंबीर यातूनही प्रथिने कार्बोदके व व्हिटामिन मिळतात.
आपली डाळीची खिचडी. या बरोबर तूप लिंबू असेल तर उत्तम पोषण मिळते. आपल्या रोजच्या आहारात आपण असे पदार्थ योग्य जोडीने खाल्ले तर उत्तम पोषण मिळतेच.
सध्या आपल्याला साथीच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर भरपूर प्रथिने, व्हिटामिन क, हे आहारात असणे गरजेचे आहे. त्यासाठी सतत बाहेर न जाता घरातल्या घरात जे पदार्थ बनवू शकतो व त्यातून आपली प्रतिकारशक्ती देखील वाढेल हे पहिले पाहिजे. चला तर मग घरी राहू प्रतिकारशक्ती वाढवू आणि या करोनाशी दोन हात करू. काळजी घ्या निरोगी राहा.
– श्रुती देशपांडे