कोल्हापूर – महाराष्ट्रात निर्माण झालेल्या करोना लसींच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य असा संघर्ष वाढला आहे. महाआघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. तर केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे तेथील आणि राज्यातीलही नेते राज्यात नियोजन आणि समन्वयाचा अभाव असल्याचे म्हणत राज्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत.
आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी गेल्या दोन दिवसांत राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून लस न घेताच अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परतावे लागले असून मुंबईसह पुण्यातील व अन्य ठिकाणची काही केंद्रे गुरूवारी आणि शुक्रवारी बंद करण्यात आली होती. या वादात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्राला करोना लसींचा पुरवठा वाढवून मिळाला नाही तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून दुसऱ्या राज्यांमध्ये करोना लसी घेऊन जाणारी एकही गाडी बाहेर पडून देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
आपण यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि गृहमंत्र्यांना पत्रही लिहले आहे. आठवडाभरात महाराष्ट्रातील करोना लसींचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते राजू शेट्टी यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.