मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी हा दावा दाखल केला आहे.
अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने आरोप करून माझ्यासह कुटुंबाची आणि पक्षाची नाहक बदनामी करण्यात येत आहे. तसेच जनमानसातील प्रतीमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी हा दावा दाखल केल्याची माहिती वायकर यांनी दिली. सोमय्या यांनी केलेले आरोप निराधार आहेत. प्रसारमाध्यमांनीच सोमय्या यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आणले असून ते तोंडघशी पडले असल्याचं वायकर यांनी सांगितलं.
अलिबाग कोर्लई येथील संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. तसेच, महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून २५ कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी समाजमाध्यमांद्वारे केला होता.