पुणे – शहरातील व जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरातील बस वाहतूक, हाॅटेल, माॅल, रेस्टाॅरंट, बार, धार्मिक स्थळे हे उद्यापासून अठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दिवसा जमावबंदी तर संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण दुकाने बंदी व संचार बंदीचे आदेश आहेत.
या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शवला आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या काही निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
पीएमपीएमएल बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? त्यामुळे 40 टक्के क्षमतेने बस सेवा सुरु ठेवावी. हाॅटेल्स पूर्ण क्षमतेने बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या, अशी मागणी गिरीश बापट यांनी केलीय. तसेच संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवे. गरजू लोकांना रेशन द्या. काही न देता निर्बंध लावणे चुकीचे आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला आमचा विरोध असून रात्री 8 पासून संचारबंदी करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे.
विभागीय आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील 7 दिवसांसाठी बंद
- Pmpl सेवा ही सात दिवसांसाठी बंद
- आठवडा बाजार सात दिवस बंद.
- होम डिलिव्हरी सुरू राहणार.
- लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद
- अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद.
-सर्व धार्मिक स्थळे बंद - दिवसा जमाव बंदी. रात्री संचार बंदी…
- उद्याने सकाळी सुरू रहाणार
- उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं…
-शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार. मात्र, परीक्षा वेळेत होणार.