पिंपरी – करोनामुळे शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करावा लागला. मात्र, महाराष्ट्र शासनाने आता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे. अभ्यास ऑनलाइन मग परीक्षा ऑफलाइन का? असा प्रश्न उपस्थित करत शहरातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा देखील ऑनलाइन घेण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथील अनिष काळभोर, मयूरेश पाटील व अरमान पटेल या विद्यार्थ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने करोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
तरी, या परोक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 29 लाखांच्या घरात आहे. परीक्षा ऑफलाइन घेतल्याने करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. यामुळे परीक्षा देखील ऑनलाइन घ्याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.