– श्रीनिवास वारुंजीकर
टोपी मुनिअप्पा या कानडी सिने-नाट्य दिग्दर्शकाचं नाव आज फारसं कुणाला माहिती नसेल. पण या मुनिअप्पांनी बेंगळुरूच्या सिटी बस प्रवासात शोधलेलं रत्न गेली 40 वर्षे सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. नुसतं लोकप्रियच नव्हे, तर राजमान्यता मिळालेलं हे रत्न म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील स्टाईलबाज ऍक्टर रजनीकांत अर्थात शिवाजीराव गायकवाड. आज त्यांना भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला, आणि पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात मावडी-कडेपठार हे मूळ गाव असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याच्या कर्तृत्त्वाने अभिमानाने भरुन आली.
तर प्रसंग असा होता, की हे टोपी मुनिअप्पा बेंगळुरूमधल्या सिटी बसने प्रवास करत होते आणि या बसचा कंडक्टर अत्यंत विचित्र स्टाईल मारताना दिसत होता. प्रवाशाकडून पैसे घेताना, त्यांचे तिकिट फाडून देताना आणि उरलेली मोड परत देताना हा कंडक्टर अशा काही प्रकारे ऍक्शन्स करायचा की, बसमधील प्रवाशांची करमणूक व्हायचीच; शिवाय जोडीला त्याची डायलॉगबाजीही चालायची. हाच तो रजनीकांत. त्याची ही स्टाईलबाज कंडक्टरी पाहूनच मुनिअप्पा यांनी त्याला नाटकात आणि मग पर्यायाने सिनेमात काम करण्याची संधी दिली.
मग रजनीकांतने आपले मराठमोळे नाव बाजूला ठेवत “रजनीकांत’ हे अस्सल दाक्षिणात्य नाव धारण केले आणि मग कन्नड, तमिळसह दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि मग बॉलिवुड अर्थात हिंदी सिनेसृष्टीत आपले बस्तान बसवत तो कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. अल्पावाधीतच त्याच्या लोकप्रियतेची दहशत एवढी मोठी झाली की, त्याचा सिनेमा प्रदर्शित होताना अन्य कोणताही निर्माता आपला सिनेमा प्रदर्शित होऊ देत नसे. रजनीच्या सिनेमाची गर्दी ओसरायला लागल्यानंतरच अन्य सिनेमे प्रदर्शित केले जात.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे रजनीकांत तर तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहे. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं. त्यांचा वाढदिवस हा तिथे एखादा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये बंगळूरू येथील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांची आई गृहिणी होती तर वडील रामोजीराव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून वडिलांनी रजनीकांत यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं. ते घरी मराठी आणि बाहेर कन्नड भाषा बोलायचे. रजनीकांत यांचे जवळचे मित्र राज बहादुर यांनी रजनीकांत यांना सिनेमात काम करण्यासाठी आणि अभिनेता होण्यासाठी प्रोत्साहित केलं. राज बहादुरसोबत आजही रजनीकांत यांचं फार जवळचं नातं आहे. बहादुर यांनीच रजनीकांत यांना मद्रास फिल्म संस्थेत नाव दाखल करण्याचा सल्ला दिला होता.
रजनीकांत यांनी मद्रास फिल्म इन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा केला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात पौराणिक कन्नड नाटकांमधून केली. यात त्यांची दुर्योधनाची भूमिका सर्वाधिक गाजली. दिग्दर्शक के. बालाचंदर यांनी रजनीकांत यांना एका कन्नड नाटकात काम करताना पाहिले होते. नाटकानंतर बालाचंदर यांनी रजनीकांत यांना तमिळ शिकायला सांगितले. अभिनयाचं शिक्षण घेत असतानाच रजनीकांत यांनी तमिळ भाषा शिकले.
करिअरच्या सुरुवातीला रजनीकांत यांनी अनेक सिनेमांत नकारात्मक भूमिका केल्या. यानंतर एस.पी. मुथूरमन यांच्या “भुवाना ओरू केल्विकुरी’ सिनेमात त्यांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका साकारली. अमिताभ बच्चन यांचा डॉन सिनेमाच्या रिमेकने रजनीकांत यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. “बिल्ला’ हा सिनेमा तेव्हाचा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
“मून्द्रू मूगन रजनी’ या सिनेमात रजनीकांत यांनी तीन व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या सिनेमासाठी त्यांना तमिळनाडू सरकारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला होता. टी रामा राव यांच्या “अंधा कानून’ सिनेमातून रजनीकांत यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. यात त्यांचे सहअभिनेते होते अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी.
रजनीकांत यांची पत्नी लता रंगाचारी त्यांच्याहून आठ वर्षांनी लहान आहे. लता त्यांच्या कॉलेज मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या होत्या. लता आता चेन्नईमध्ये “द आश्रम’ नावाची शाळा चालवतात. लता आणि रजनीकांत यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत.
“शिवाजी- द बॉस’ हा रजनीकांत यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. या सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी कित्येक कोटी रुपये घेतले होते. याच सिनेमामुळे जॅकी चॅननंतर सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून रजनीकांत यांचं नाव समोर आलं.
रजनीकांतने तर हयातभर सुपर हीरो साकारला आहे. सर्वसामान्य माणसांच्या दबलेल्या आणि बहुधा कधीच पूर्ण न होणाऱ्या आशा आणि स्वप्ने यांना पडद्यावर का होईना, प्रत्यक्षात आणणारे हे नट म्हणजे त्यांचे कलियुगातले देवच आहेत. देवांमध्येही सुपर देव असतातच, तसाच रजनीकांत आहे. भारतीय सिनेसृष्टीत एक दंतकथा बनून राहिलेल्या रजनीकांत यांनी राजकारणाच्या आखाड्यातही पाऊल ठेवलं आहे, हे विशेष.
जिवंतपणीच एक दंतकथा बनलेल्या या अभिनेत्याविषयी लिहावं तितकं थोडंच आहे.
रजनीकांतने मिळवलेले राष्ट्रीय पुरस्कार
1. काळिमामणि – तामिळनाडू सरकार तमिळ चित्रपट उद्योग
2. तामिळनाडू राज्य चित्रपट मानद पुरस्कार- एम.जी.आर पुरस्कार तमिळनाडू सरकार
3. पद्मभूषण – भारत सरकार
4. राज कपूर पुरस्कार – महाराष्ट्र शासन
5. एमजी.आर-शिवाजी पुरस्कार – तामिळनाडू सरकार
6. भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्वाचा शताब्दी पुरस्कार – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
7. पद्मविभूषण – भारत सरकार
8. एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार – नंदी पुरस्कार
9. गोवा फिल्म फेस्टीवल – सुवर्ण महोत्सवी पुरस्कार
10. दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकार
सर्वोत्कृष्ट अभिनेता दाक्षिणात्य पुरस्कार…
1979अरिलिरंथु अरुबाथू वरई
1982 एन्कीओ केट्टा कुरल
1984 नालावणुकू नालावन
1985 श्री राघवेंद्र
1991 थलापथी
1992 अन्नामलाई
1995 बाशा, मुथु
1993 वल्ली सर्वोत्कृष्ट कथा लेखक