कोलकाता – प. बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्षच पुन्हा विजयी होईल आणि त्याच पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री बनतील असे विविध जनमत चाचण्या आणि सर्वेंद्वारे आतापर्यंत निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मात्र आता एक नवा सर्व्हे समोर आला असून त्यानुसार खुद्द ममता बॅनर्जीच नंदीग्राममधून पराभूत होणार असल्याचा आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या नव्या सर्व्हेला महत्व देण्याचे कारण म्हणजे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या कंपनीने तो केला आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी काम केले होते व त्या पक्षाचे बहुमताने केंद्रात सरकार आले. त्यानंतर त्यांनी विविध राज्यांत विविध पक्षांसाठी काम केले व त्या सगळ्याच पक्षांना सत्ता हस्तगत करण्यात यश आले.
त्याहून महत्वाचे म्हणजे प्रशांत किशोर गेल्या काही काळापासून ममतांच्या तृणमूलसाठी काम करत असून त्यांच्या सर्व्हेत जर भाजपच्या विजयाची दावा केला जात असेल तर हा तृणमूलला मोठा हादरा असून हा सर्व्हे व्हायरल झाल्यावर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर तृणमूलने भाजप नंदीग्राममधून पराभूत होत असल्यामुळे हा बोगस सर्व्हे व्हायरल केला असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, भाजप बंगालमध्ये पाच मुद्द्यांवर काम करत असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. 1. समाजात धृवीकरण करणे 2. ममतांच्या बद्दल मतदारांमध्ये नाराजी निर्माण करणे 3. तृणमूल पक्ष संघटना आता व्हेंटीलेटरवर गेल्याचे सिध्द करणे 4. दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा जास्तीत जास्त लाभ घेणे.
हे ते पाच मुद्दे असून ममतांची प्रतिमा खराब करणे आणि मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे किशोर यांनी अलिकडेच म्हटले होते.